जयपूर – कॉंग्रेसची सत्ता असणारे राजस्थान बराच काळपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरूद्ध तरूण नेते सचिन पायलट असा संघर्ष अनुभवत आहे. अर्थात, त्याला भारत जोडो यात्रेवेळी काही काळ विराम मिळाला. एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या नेत्यांमध्ये मनोमिलन होण्याचे संकेत मिळू लागले. मात्र, यात्रेवेळी दिसलेली जवळीक संपुष्टात येऊन सत्तासंघर्षाच्या ठिणग्या पुन्हा पडू लागल्या आहेत.
राजस्थानात नेतृत्वबदल होईल आणि पायलट यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, असे मानले जात होते. खरेतर, कॉंग्रेस श्रेष्ठींचाही तसाच मानस असल्याचे समोर आले. पण, गेहलोत समर्थक आमदारांनी एकप्रकारे बंडाचे निशाण फडकावत मुख्यमंत्री बदल होऊ दिला नाही. त्या घडामोडींमुळे राजस्थान कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. प्रदेश शाखेत गेहलोत आणि पायलट समर्थक असे दोन गट पडले आहेत.
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये दाखल
यात्रेमुळे ते गट एकमेकांशी जोडले जातील, त्यांची मने जुळतील असे चित्र समोर आले. पण, ते चित्र वरवरचेच ठरले. साधारण महिनाभरापूर्वी यात्रेने राजस्थान सोडले. त्यानंतर मागील काही दिवसांपासून दोन्ही गट पुन्हा एकमेकांविरोधात दंड थोपटू लागले आहेत.
स्वत: पायलट अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी जनसंपर्क अभियान हाती घेतले आहे. त्यातून शक्तिप्रदर्शन करून ते एकीकडे गेहलोत गटाला अप्रत्यक्ष इशारा देत आहेत; तर दुसरीकडे कॉंग्रेस श्रेष्ठींचेही लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
पायलट यांनी काही मुद्द्यांवरून स्वपक्षाच्याच सरकारला घेरण्याचेही सत्र आरंभले आहे. त्यामुळे गेहलोत गटही आक्रमक होण्याची शक्यता बळावली आहे. त्यातून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थान कॉंग्रेसमधील दुहीची तीव्रता वाढू शकते. त्या राज्यात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याचा विचार करून कॉंग्रेस श्रेष्ठींनी दोन गट जोडण्यासाठी पाऊले उचलण्याची वेळ आता आली आहे.