लखनपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा गुरूवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. त्यामुळे कॉंग्रेसची महत्वाकांक्षी यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेच्या स्वागतस्थळी अब्दुल्ला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसमवेत बसने प्रवास करून पोहचले.
कॉंग्रेसच्या यात्रेचा प्रारंभ मागील वर्षी 7 सप्टेंबरला कन्याकुमारीमधून झाला. त्या यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होईल. विविध राज्यांमधून मार्गक्रमण केलेल्या यात्रेत याआधी इतर काही पक्षांचे नेतेही सहभागी झाले. यात्रेच्या समारोपावेळी उपस्थित राहण्याचे निमंत्रण कॉंग्रेसने अनेक पक्षांच्या नेत्यांना दिले आहे. त्या निमंत्रणाला कसा प्रतिसाद मिळणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.