रावणगाव – खडकी (ता. दौंड) येथे शेतामध्ये काम करीत असताना वादळापासून वाचण्यासाठी अंगावर घेतलेल्या प्लॅस्टिकच्या तळवटावर पोल्ट्रीची भिंत पडून दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. चिंतामणी सोनबा जगताप (वय 57) व सुनीता चिंतामणी जगताप (वय 52, रा. खडकी), असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (दि.29) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
शेतात काम करत असताना सायंकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण होऊन विजांच्या गडगडाटासह जोराचे वादळ सुरू झाले. त्यामुळे पावसाच्या भीतीमुळे जवळच शेतात नवीन बांधलेल्या पोल्ट्रीच्या भिंतीच्या आडोशाला प्लॅस्टिक तळवट अंगावर घेऊन हे दाम्पत्य बसले होते.
जोरदार वाऱ्यामुळे पोल्ट्रीची भिंत त्या तळवटावर पडली. आडोशाला बसलेल्या दोघांना वरून भिंत कोसळल्याने बाहेर पडता आले नाही. त्यातच त्यांचा गुदमरून दुर्देवी मृत्यू झाला. दौंड पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. रावणगाव पोलीस चौकीचे पोलीस नाईक हरिभाऊ होले तपास करीत आहेत.