निर्यातीवर मर्यादा आणूनही दरवाढ सुरूच
पुणे – कांदा उत्पादन करणाऱ्या बऱ्याच राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. केवळ कांदा उत्पादनावरच परिणाम झालेला नसून वाहतुकीवरही झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढत आहेत. सुरुवातीला राज्य आणि केंद्र सरकारने दरवाढ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे साठ्यावर मर्यादा आणण्याच्या शक्यतेवर विचार सुरू आहे.
केंद्र सरकारने स्वतःच्या साठ्यातील बराच कांदा राज्यांना उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर काही वितरण संस्थांच्या माध्यमातूनही पुरविला जात आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात निर्यात रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केली आहे.
तरीही गेल्या आठवड्यात कांद्याचे दर वाढले असल्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, हरयाणा आणि इतर काही राज्यांत निवडणुका होणार असतानाच कांद्याचे दर वाढणे सरकारला राजकीय दृष्ट्या कठीण जाणार आहे. त्यामुळे कांद्याच्या साठ्यावर मर्यादा आणण्याच्या शक्यतेवर विचार सुरू आहे.
महाराष्ट्रातील लासलगाव येथे कांद्याचे दर ठरतात. येथील घाऊक बाजारपेठेत गेल्या आठवड्यात कांद्याचे दर 45 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले आहेत. गेल्यावर्षी या काळात हे दर केवळ 10 रुपये प्रति किलो होते. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत उपयोगी कांद्याचा 56 हजार टनांचा साठा तयार केला होता. त्यातील 16 हजार टन राज्यांना दिला आहे.