लष्कर प्रमुख बिपीन रावत यांची माहिती
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळाविषयी भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला असल्याचे रावत यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हवाई हल्ला करुन हा तळ उद्धवस्त केला होता. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सोमवारी ही माहिती दिली. इंडियन एअर फोर्सच्या एअर स्ट्राइकमध्ये बालकोटच्या दहशतवादी तळाचे नुकसान झाले होते हे यावरुन स्पष्ट होते.
Army Chief General Bipin Rawat: Balakot has been re-activated by Pakistan, very recently. This shows Balakot was affected, it was damaged; it highlights some action was taken by the Indian Air Force at Balakot & now they have got the people back there. pic.twitter.com/IFN7SjJDud
— ANI (@ANI) September 23, 2019
आता पाकिस्तानने पुन्हा त्या ठिकाणी लोकांची जमवाजमव सुरु केली आहे असे जनरल रावत म्हणाले. कालच एका वर्तमानपत्राने बालकोटमधील दहशतवादी तळ सुरु झाल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी या तळावर 129 दहशतवादी सज्ज आहेत असे एका वृत्तवाहिनीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-2000 फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले.