अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारवर आगपाखड
देश आणि लोकशाही कमकुवत होतेय
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाला पंजाबात प्रचंड बहुमत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार दिल्लीतील महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार मतप्रदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुका निर्धारित वेळेत होऊ द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. निवडणुका पुढे ढकलल्याने लोकशाही व्यवस्था कमकुवत होते आणि पंतप्रधानांनी तसे होऊ देणे योग्य नाही, असेही केजरीवालांनी म्हटले आहे.
आयोगाने, केंद्राच्या सूचनेनंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा पुढे ढकलली. या तीन महापालिकांचे एकत्रीकरण करण्याचे कारण देत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण ज्या दिवशी निवडणुका जाहीर होणे अपेक्षित होते त्याच दिवशी त्यांना हा महापालिका एकत्रीकरणाचा विषय का आठवला, असा सवाल केजरीवालांनी केला.
ते म्हणाले की, दिल्लीत आम आदमी पक्षाची लाट आहे हे भाजपला माहिती आहे म्हणूनच ते या निवडणुका घोषित करण्यात कचरत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. निवडणुका आणि तीन महापालिका संस्थांचे एकत्रीकरण यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केजरीवाल म्हणाले, तीन महपालिकांच्या एकत्रीकरणाशी निवडणुकीचा काय संबंध? हा निर्णय निवडणुकीनंतरही होऊ शकतो.
केजरीवालांनी म्हटले आहे की, हात जोडून मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी या निवडणुका होऊ द्याव्यात. सरकारे येतात आणि जातात. देश महत्त्वाचा असतो, राजकीय पक्ष नाही. जर आपण निवडणूक आयोगावर दबाव आणला तर ती संस्था कमकुवत होते. आपण ही संस्था कमकुवत होऊ देऊ नये, यामुळे लोकशाही आणि देश कमकुवत होतो, असे ते म्हणाले.
शहरातील तीनही महापालिकांवर सध्या भाजपची सत्ता आहे, दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे एकत्रीकरण करण्यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणण्याची केंद्राची योजना आहे. त्याचे कारण देत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात येते.