सातारा – देगाव (ता. सातारा) येथील जमिनींवरील एमआयडीसीचे शिक्के तातडीने उठवा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. सातारा तालुक्यात देगावजवळ एमआयडीसी टप्पा एक व दोन कार्यान्वित झाला. तिसऱ्या टप्प्यासाठी देगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. मात्र, या जमिनी सुपीक असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा या जमिनी देण्यास विरोध आहे.
शेतकऱ्यांचा विरोध व सुपीक जमीन अधिग्रहण न करण्याचा असलेला कायदा यामुळे आ. शशिकांत शिंदे या जमिनी घेऊ नये म्हणून आग्रही आहेत. जिल्ह्यातील पिकाऊ नसलेल्या पुसेगाव, माण तालुका, पाटण आदी ठिकाणी एमआयडीसीसाठी भरपूर जमीन उपलब्ध असताना शासनाचा कायदा व शेतकऱ्यांचा विरोध दोन्ही बाबी लक्षात घेता देगाव येथील जमिनींवरील शिक्के उठवावे, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली. या जमिनी अधिग्रहण झाल्याने स्थानिक शेतकरी भूमीहिन झाले आहेत. तसेच जमिनींवर असलेल्या शिक्क्यांमुळे शेतकऱ्यांना त्यावर कर्जसुद्धा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, ही बाब आ. शिंदे यांनी मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या निदर्शनात आणून दिली होती.
त्यावेळी त्यांनी हे शिक्के उठवू असा शब्द उपस्थित शेतकऱ्यांना दिला होता. मात्र, तांत्रिक बाबींनी या गोष्टीला विलंब झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात लक्षवेधी मांडून आ. शिंदे यांनी देगाव येथील जमिनींवरील शिक्के उठवणार आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर “हे शिक्के उठवले जातील, त्यासाठी उच्चस्तरिय समिती गठीत करून आवश्यक बाबींची तरतूद त्वरित केली जाईल,’ असे उत्तर मंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
आ. शशिकांत शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना आ. बावनकुळे, आ. महादेव जानकर, आ. तटकरे यांनी सहभाग घेत शिंदे यांच्या मागणीला पाठींबा दिला. राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी या मागणीला अनुकूलता दर्शवली तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिक्के उठवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल, असा शब्द दिला.