नवी दिल्ली: करोनाशी सामना करण्यासाठी देशात तीन वेळा लॉकडाऊन लागू करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. देशात अनेक जण लॉकडाऊनच्या बाजुने आहेत. पण देशाची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यासाठी उद्योगधंदे सुरु होणे देखील महत्त्वाचे आहे. असे असले तरी ज्या राज्यांत करोनाचे जास्त रुग्ण आहेत. त्या राज्यात आणखी कठोर लॉकडाऊन जाहीर केले जावू शकते.
वास्तविक, करोनामुळे अर्थव्यवस्था ढासळत आहे. राज्यांकडून सतत मदत पॅकेजची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत ज्या राज्यांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा राज्यांत आर्थिक गोष्टींसाठी दिलासा मिळू शकेल. सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह झोनचा निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली. अनेक राज्यांनी झोन निश्चित करण्यासाठी राज्याला अधिकार देण्याची मागणी केली होती. या बैठकीत 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यासाठी मागणी केली होती.
गुजरात आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक उपक्रम वाढविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा पुढील टप्पा हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली जाऊ शकते. गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, नागालॅंड या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे.
हिंदी भाषिक राज्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंड येथे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या राज्यांतील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. राज्यांची अर्थव्यवस्था बाधित झाल्याने त्याचा थेट परिणाम केंद्रावर होत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान या राज्यांना काही प्रमाणात सूट देतील.