ना. छगन भुजबळ; उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देणार
शिरवळ – नायगावच्या विकास आराखड्यातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सावित्रामाई फुले यांचे क्रांतिकारी विचार सर्व क्षेत्रात पेरण्यासाठी राज्यात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना एक लाख रुपयांचे पुरस्कार देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
जिल्हा परिषद, खंडाळा पंचायत समिती, नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जनक आणि नायगावच्या थोर सुकन्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती शुक्रवारी उत्साहत साजरी करण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. आ. मकरंद पाटिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शशिकांत शिंदे, प्रा. हरी नरके, महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विभाते, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगौड, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपविभागीय अधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर,प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव, अश्विनी पवार, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, रमेश धायगुडे, गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे व मान्यवर उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे माहेर असलेले नायगाव हे ऊर्जा केंद्र आहे. फुले दाम्पत्याचा कार्याचा आदर्श देशाबरोबर परदेशातही घेतला गेला. नायगाव येथे इंजिनिअरिंग कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करू. फुले दाम्पत्याच्या कार्याकडे राजकारण म्हणून न पाहता सामाजिक दृष्टिकोनातून पहावे. हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सद्य स्थितीत समता आणि समानतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो. फुले दाम्पत्याच्या कार्याचा विसर जनतेला पडत आहे, हे दुर्दैव आहे.त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे पारायण केले पाहिजे. शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत येत्या कालावधीत बदल अपेक्षित आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही विचार करण्यात येत आहे. आगामी काळात नायगाव हे “होयगाव’ होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
नायगावची भूमी स्त्री शिक्षणाचे माहेरघर व्हावे यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल.
आ. मकरंद पाटील म्हणाले, फुले दाम्पत्याने समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट होण्यासाठी त्याग केला. सावित्रीबाईंच्या नावाला शोभेल अशा नायगावच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. राम शिंदे, उदय कबुले, शशिकांत शिंदे, राजेंद्र तांबे, हरि नरके यांनी मनोगत व्यक्त केले. नितीन भरगुडे यांनी स्वागत केले. सुधीर नेवसे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप विधाते यांनी आभार मानले. प्रारंभी सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्य कार्यक्रमात चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि सावित्रीज्योती मालिकेतील अजय भाळवणकर, निर्माते नितीन वैद्य व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांकडून अभिवादन
मुंढे, ता. कराड येथील हुतात्मा जवान संदीप सावंत यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता यावे म्हणून ना.बाळासाहेब पाटील व ना. शंभूराज देसाई यांनी नायगाव येथे सकाळी फुले दाम्पत्याला अभिवादन केले आणि नंतर लगेचच कराडकडे प्रयाण केले.