नगर, (प्रतिनिधी) – नगर शहरासह तालुक्यात गेल्या चार दिवसांत मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४१ अंश सेल्शियसवर पोहोचल्याने प्रचंड उकाड्याने नगर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाचा शेतपिके व फळबागांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हवेत आल्हादायक गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकही सुखावले होते, मात्र मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, अचानक उष्णता वाढली आहे.
गुरुवार (दि.२) रोजी दुपारी नगरचे तापमान ४१ अंशांवर गेले होते. त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला. दरम्यान, ढगाळ हवामानामुळे अवकाळी पावसाचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. परिसरात केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कडक उन्हामुळे आंबा बागायतदारही हवालदिल झाले आहेत.
दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवते. दिवसभर नागरिक घामांच्या धारांमध्ये भिजून निघत आहेत. उकाड्याने नागरिक प्रचंड हैराण झाले असून, आरोग्यावरही या उन्हाचा परिणाम होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी ग्रासले असून, सरकारी व खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. तालुक्यातील नागरिक तापमानातील बदलामुळे, अधुनमधून हवामानात बदल असल्याने सर्दी, ताप, खोकल्य उपचारासाठी दवाखान्यात खेटा मारत आहेत.
उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नागरिकांना थकवा जाणवतो, तर काहींना उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे. शारीरिक थकव्यामुळे पायाला गोळे येत आहेत. जेवण कमी होते. काहीही खावेसे वाटत नाही. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा. दुपारचा प्रवास टाळावा. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश कर्डिले यांनी केले.