फलटण -करोनासारख्या संकटात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये भांडणे लावून फलटणचे प्रशासन आपली पोळी भाजून घेण्याचे राजकारण करीत असून त्यामुळे फलटणकर नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे .
शहरालगत जाधववाडी येथे करोना रूग्ण सापडल्यानंतर शहरामध्ये बफर क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर फलटण प्रशासनाने दोन वेगवेगळ्या बैठका लावल्या दुपारी 12 ते 1 वाजेपर्यत फलटण विश्रामगृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची व नंतर अर्ध्या तासाच्या फरकाने दुपारी दीड ते अडीच वाजेपर्यत प्रांत कार्यालयात भाजप, सामाजिक कार्यकर्ते, मनसे व इतर राजकीय पक्षांची. दोन बैठका घ्यायचे कारण नव्हते.
एकाच बैठकीला सर्वपक्षीय लोकांना बोलावता आले असते. दोन बैठका घेऊन प्रशासनाने चांगलेच राजकारण केले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जाणीवपूर्वक भांडणे लावली आहते. सत्ताधाऱ्यांना विरोधकांची भीती दाखवून विरोधकांना गोंजारण्याचे काम प्रशासन करीत आहे. या बैठका निष्फळ ठरल्या असून त्यातून काहीच साध्य झाले नाही. उलट दोन्ही बैठकांना आलेल्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून राजकारण पेटले आहे. त्यामुळे फलटणकरांमध्ये संभ्रमावस्था आहे. या बैठकीला सर्व नगरसेवक, पत्रकार, राजकीय पदाधिकारी, समाजसेवकांनाही बोलवले नव्हते. संकटाच्या काळात ही वेळ श्रेयवाद घेण्याची नाही अशी भावना सर्व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रशासनाकडून राजकारण झाले आहे.
क्वारंटाइनमधील चौघे पळाले
प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, पोलीस प्रशासन ही कार्यालये हातात हात घालून काम करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. करोनाबाधित परिचारिका नगरपालिकेत येऊन गेल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत ठिकाणी क्वारंटाइन न करता पाण्याच्या टाकीजवळील एका खोलीत ठेवले होते. ते चौघेजण पळून गेले असून करोनाला हेच खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनासारख्या महाभंयकर परिस्थितीत फलटणमध्ये मात्र सगळा सावळा गोंधळ आहे.