श्रीगोंदा -“घोड’च्या डाव्या कालव्याचे आवर्तन सध्या सुरु आहे. टेलकडील सिंचन पूर्ण झाले आहे. चालू आवर्तनाचे पाणी सध्या तालुक्यात सुरु असून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. “घोड’च्या सध्या सुरु असलेल्या आवर्तनात प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला “घोड’चे पाणी मिळेल. या आवर्तनात पाण्यापासून कोणीही शेतकरी वंचित रहाणार नाही, अशी ग्वाही “नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.
दरम्यान धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहाता पुढील आवर्तनाबाबत शाश्वती नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संयम व समन्वयातून सर्वांची भरणे उरकावीत, असे आवाहन यांनी केले आहे. “घोड’च्या लाभक्षेत्रातील टेलकडील कर्जत तालुक्यातील सिंचन पूर्ण झाले असून श्रीगोंदा तालुक्यातील सिंचन सुरु करणेत आले आहे. “घोड’च्या आवर्तनात सुरुवातीला अडचणी आल्या. परंतु, आता घोडचे आवर्तन सुरळीतपणे सुरू आहे.
तालुक्यातील सर्व लाभार्थींचे भरणे कटाक्षाने करण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून सर्व शेतकऱ्यांचे भरणे होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी दिला आहे असे सांगून ते म्हणाले की, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आवर्तनाच्या नियोजनात जलसंपदा विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार सर्व भरणे होणारच आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता जलसंपदा विभागाच्या नियोजनात हस्तक्षेप टाळावा. यावर्षीचा पाणीसाठा पाहता उन्हाळी हंगामात आणखी एक आवर्तन मिळणे अपेक्षित होते.
लॉकडाऊनमुळे उद्योगांचा पाणी पुरवठाही बंद होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी एका आवर्तनाची आशा होती, मात्र धरणातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा पाहता पुढील आवर्तन होईल की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे चालू आवर्तनाचे योग्य नियोजन करून काळजीपूर्वक भरणे करावी लागणार आहेत.