पुणे – ‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे. वारं बदललं, तसं अनेक जण बदलतात. जर कुणी नगरसेवक आपल्या प्रभागाचा किंवा वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परत येण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही कारण फक्त विकास आहे. बेरजेचे राजकारण करावे लागते,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत सूचक व्यक्तव्य केले.
पुणे महापालिकेतील भाजपचे
19 नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर विचारले असता, पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “मागील काळात नरेंद्र मोदी यांचा झंझावात होता. देशात भाजपची सत्ता आली. अनेक राज्यांत व महापालिकांमध्ये भाजप सत्तेत आले. परंतु आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे. वार बदललं की काही जण बदलत असतात. राजकारणात काम करताना वेगवेगळे टप्पे येत असतात. अनेक जण अनेक वेळा वेगळे निर्णय घेत असतात. मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जणांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. उड्या मारणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसते.’
…मुंडे आणि आमच्या पक्षाचीही बदनामी
एखादी राजकीय व्यक्ती काम करत असते. त्यावेळी त्यांना प्रचंड काम करावं लागते कष्ट घ्यावे लागतात. पण जेव्हा वेगळा काही प्रकार घडतो. तेव्हा त्याला एका क्षणात पायउतार व्हावे लागते. ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध वक्तव्य केले त्याला जबाबदार कोण?, असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. आमच्या पक्षातील सहकारी तो बदनाम होतो, त्यांचे कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले, आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण, धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.