उद्या लॉटरी कोणाला लागणार? पक्षीय संख्याबळावरच सत्तासंघर्षाची चिन्हे
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाल डिसेंबरअखेर संपणार असून मुंबईत मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मंगळवारी (दि. 21) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांची राजकीय कसोटी लागणार आहे. या सोडतीत कोणाचे नशीब उजळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पक्षीय संख्याबळामुळे सत्ता संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने बहुतांशी सत्तास्थाने ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, मदन भोसले या दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीला भगदाड पाडण्यात भाजप नेते यशस्वी ठरले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत या दिग्गजांना मानणारे सदस्य राष्ट्रवादीच्या विरोधात सत्ता संघर्ष करतील, असे वाटत होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत वेगळेच दिसत दिसले. आता मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषदेत पक्षीय संख्याबळावर सत्तासंघर्ष होणार आहे.
जिल्हा परिषदेचे संख्याबळ 64 असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 39, भाजप व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रत्येकी सात, सातारा विकास आघाडी व कराड तालुका विकास आघाडीचे प्रत्येकी तीन, शिवसेना दोन, पाटण विकास आघाडी एक आणि अपक्ष दोन, असे पक्षीय बलाबल आहे. तरडगाव गटातून निवडून आलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी तर म्हसवे गटातून निवडून आलेले आणि आ. शिवेंद्रराजे भोसलेंचे कट्टर समर्थक वसंतराव मानकुमरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. शिक्षण समितीच्या सभापतिपदी राजेश पवार, कृषी समितीच्या सभापतिपदी मनोज पवार,
समाजकल्याण समितीचे सभापतिपदी शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी वनिता गोरे यांना पहिल्या अडीच वर्षांसाठी संधी देण्यात आली. 21 सप्टेंबर 2019 रोजी या पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार होती; परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांना चार महिने मुदतवाढ मिळाली होती. ही मुदत डिसेंबरअखेर संपत असून मंगळवारी सकाळी 11.30 वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून राज्यातील सत्तासंघर्षाचा परिणाम आगामी काळात जिल्हा परिषदेत दिसणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारण बदलले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे महेश शिंदे, माण मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे यांनी विजयश्री खेचून आणली. त्यामुळे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मानणारे सदस्य आरक्षण सोडतीनंतर वेगळी भूमिका मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदांसह पंचायत समितीच्या सभापतींच्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आरक्षण सोडतीनंतर राष्ट्रवादीला आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंतच्या आरक्षण सोडतीत खुल्या प्रवर्गातील पुरुष, खुल्या प्रवर्गातील महिला, भटक्या जमाती प्रवर्गातील महिला, ओबीसी महिला असे आरक्षण पडले होते. मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष आणि भटक्या जमाती प्रवर्गातील पुरुष हे आरक्षण अद्याप पडलेले नाही. या दोन्हीपैकी आरक्षण पडल्यास राष्ट्रवादीकडून पाटणमधील बापूसाहेब जाधव, औंध गटातील शिवाजी सर्वगौड, वाठार स्टेशन गटातील डॉ. अभय तावरे यांना संधी मिळू शकते.