मुंबई : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर पक्षाला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा केली जात असतानाच आता महाराष्ट्रातून काँग्रेसला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कारण वाशीम जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अनंतराव देशमुख यांच्या पाठीशी मोठा जनाधार असून स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण राजकारणावर त्यांची घट्ट पकड असल्याने त्यांच्या भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठा झटका मनाला जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील जवळपास दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांसह अकोला जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितमधील काही पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करणारआहेत. त्यामुळे भविष्यात वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक गड असला तरी देशमुख यांचा या दोन्ही तालुक्यात मोठा प्रभाव आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढले होते. अमित झनक यांनी अवघ्या काही मतांनी देशमुख यांचा पराभव केला. मागील काही वर्षांपासून देशमुख काँग्रेसपासून अलिप्त होते. जनविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर चांगली पकड आहे. जिल्हा काँग्रेस आधीच गटबाजीने पोखरली आहे. अशात देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये एकच गोंधळ उडाला आहे.