आरिफ शेख
“सिलेक्टेड’ सरकार खाली खेचून “इलेक्टेड’ सरकार स्थापन करण्यासाठी पाकमध्ये डझनभर विरोधी पक्षांची आघाडी आंदोलन, निदर्शने करीत आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे लंडनहून इम्रान खान सरकार विरोधात शाब्दिक क्षेपणास्त्रे डागत आहेत. सत्तारूढ गटाने विरोधकांवर सूडभावनेने कारवाई सुरू केली आहे. पाकमधील लोकशाहीच्या मुखवट्यामागे दडलेला खरा चेहरा लष्कराचा आहे, हे वरील आंदोलनामुळे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
पाकिस्तान डेमोक्रॅटिक फ्रंटच्या नावाने बारा विरोधी पक्ष इम्रान खान सरकारच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन मिळत आहे. भ्रष्टाचार प्रकरणी विविध खटल्यांचा सामना करणारे व अपात्र ठरलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे लंडनहून या आंदोलनास मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे बंधू शाहबाज शरीफ मनी लॉंड्रीग प्रकरणी तुरुंगात आहेत. कन्या मरयम जामिनावर आहे, तर जावई कॅप्टन (रि.) सफदर हे नुकतेच तुरुंगाची हवा खाऊन बाहेर आलेत. मुस्लीम लीग (एन) पक्षाचे प्रमुख नेते व माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी विविध खटल्यांचा सामना करीत आहेत, तर अनेक जण अद्यापही तुरुंगात आहेत.
अन्य प्रमुख विरोधी पक्ष म्हणजे भुट्टोंच्या पीपल्स पार्टीचीही वेगळी स्थिती नाही. “नया पाकिस्तान’ उभारण्याचा दावा करणारे इम्रान खान सरकार हे विरोधकांना सूडबुद्धीने वागवीत आहे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला आहे. विरोधकांविषयी त्यांची भाषा व सूडभावना पाहता ते हुकूमशहाप्रमाणे वागताना दिसत आहेत. इम्रान खान सत्तेत आले तेच मुळी लष्कराच्या पाठिंब्याने. म्हणूनच त्यांना “सिलेक्टेड’ पंतप्रधान म्हटले जाते.
नवाज शरीफ हे लष्करी नेतृत्वाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागल्याने त्यांची सद्दी संपली. त्यांना विविध आरोपाखाली कसे पदभ्रष्ट करण्यात आले व न्यायमूर्तींवर कसा दबाव आणला गेला याचे अनेक पुरावे पाकच्या सोशल मीडियात झळकले होते.
प्रमुख पक्षनेते तुरुंगात असताना शरीफ कन्या मरयम या मैदानात उतरून किल्ला लढवत आहेत. धर्माचा पगडा असलेले पाकचे समाजमन एका महिलेचे नेतृत्व भविष्यात मान्य करतील का? याची बाह्य जगतात उत्सुकता आहे. एकीकडे मुस्लीम लीगकडे मरयम यांचे नेतृत्व तर दुसरीकडे मौलाना फजलूर रहेमान यांच्याकडे बारा विरोधी पक्षांचे नेतृत्व.
मौलानावर तालिबान समर्थक असल्याचा आरोप आहे. इम्रान खान सरकार जर गेलेच, तर भविष्यात मरयम नवाज अन् मौलाना हे परस्परांचे नेतृत्व किती दिवस मान्य करतील याबाबत राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया आतापासूनच ऐकायला मिळतात, असो. पाकमधील नागरी सरकार विरुद्ध लष्करी सत्तेचा सत्तासंघर्ष व पडद्यामागील घडामोडी नव्याने समोर आणल्या त्या नवाज शरीफ यांनी. त्यांनी असंख्य गौप्यस्फोट करून लष्कराची पुरती नाचक्की केली.
पंतप्रधान हा लोकशाहीचा मुखवटा अन् लष्कर हे खरा चेहरा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. (शरीफ देखील याच व्यवस्थेचे लाभार्थी आहेत, हा भाग अलाहिदा) जनरल कमर जावेद बाजवा यांची लष्करप्रमुख म्हणून निवड शरीफ यांनीच केली होती. पुढे त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ शरीफ यांच्या पक्षाने संसदेत पाठिंबा दिल्याने मिळाली होती. ज्यांनी पदावर बसविले त्यांचा काटा काढणे ही पाकमधील लष्करी नेतृत्वाची परंपरा आहे.
जनरल झिया व जनरल मुशर्रफ या आपल्या पूर्वसूरींचा कित्ता गिरवत बाजवा यांनी शरीफ यांना देशोधडीला लावले. लोकनियुक्त सरकार उलथविले म्हणून मुशर्रफ यांना सूनावलेली फाशी अन् तत्पूर्वी त्यांना सही सलामत देशाबाहेर जाऊ देणे, तसेच जनादेश घेऊन सत्तेत आलेल्या शरीफ यांना पायउतार करणे या मागील लष्कराचे कुटील डावपेच शरीफ यांनी उघड केले आहेत.
गमतीचा भाग म्हणजे 12 ऑक्टोबरला शरीफ, पाकव्याप्त काश्मीरचे तथाकथित पंतप्रधान सरदार अब्दुल कयूम पाकचे माजी पंतप्रधान शाहीद अब्बासी यांच्यावर पाकिस्तानात चक्क राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. नवाज शरीफ यांनी भाषणातून राष्ट्रीय गुपित उघड केले, अन् उपस्थित नेत्यांनी टाळ्या वाजविल्या म्हणून ही कारवाई केली गेली.
शरीफ यांची जहरी भाषा व लष्करी वर्चस्वाला दिलेले आव्हान पाहता त्यांच्यावर “गद्दार ए वतन’ अन् “इंडियन एजंट’ असे आरोप होणे पाकच्या राजकीय वातावरणास अनुसरून आहेत. खरे गद्दार कोण? देशाचे तुकडे करणारे की, पाकला अणुशक्ती राष्ट्र बनविणारे? (शरीफ यांच्या काळात पाकने अणुचाचणी केली होती) असा प्रश्न शरीफ उपस्थित करीत आहेत. ढाका येथे भारतीय सैन्य अधिकाऱ्यासमोर अपमानास्पद शरणागती पत्करणारे जनरल नियाझी यांना देशभक्त अन् शूरवीर म्हणायचे का? असा जिव्हारी लागणारा बाण शरीफ यांनी पाक सैन्यप्रमुखास मारला आहे.
जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, महागाई, बेरोजगारी, करोना संकट, इंधनाची ददात असे अनेक नागरी प्रश्न देशासमोर आ वासून उभे आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडला आहे. आदी प्रश्नांना सरकार जसे जबाबदार आहे, तसेच त्यास सत्तेवर बसविणारे देखील दोषी असल्याचा बॉम्बगोळा शरीफ यांनी टाकला आहे. वाजपेयी यांच्या काळात भारत-पाक संबंध कसे होते, आता काय झाले? काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील अशी “दुवा’ इम्रान खान यांनी मागितली नव्हती का? असा पाक राज्यकर्त्यांना अस्वस्थ करणारा सवाल ते विचारत आहेत.लष्करी नेतृत्वाला आव्हान देऊन शरीफ यांनी परतीचे दोर कापले आहेत.गद्दार ठरविले जाण्याची त्यांना चिंता नाही.
जनादेशाने सत्तेत आलेले नागरी सरकार देश चालविणार की, वर्दीतील सत्ताकेंद्र पडद्या आडून सूत्रे हलविणार? याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याचा विडा शरीफ यांनी उचललेला दिसतोय. त्यांच्या मागे आंतरराष्ट्रीय पाठबळ नसेल असे म्हणता येणार नाही. सौदी अरेबिया व अमेरिकेची त्यांना फूस असण्याची शंका घेतली जाते. शरीफ यांना लंडनहून फरफटत आणू व सामान्य कैद्याप्रमाणे जेलमध्ये ठेवू अशी धमकी इम्रान खान यांनी नुकतीच दिली आहे.
शरीफ यांना देशात आणून त्यांना सुळावर चढविणे एवढे सोपे नाही. पाकमध्ये सर्वाधिक जनाधार असलेले व सर्वात मोठ्या राज्याचे (पंजाब) ते भूमिपूत्र आहेत. त्यांच्याविरोधातील सूडभावना सरकारला परवडणारी नसेल. इम्रान खान यांना पाकमधील पंजाब राज्य हे बलुचिस्तानच्या दिशेने न्यायचे आहे का? असा सवाल दबक्या स्वरात पाकमध्ये उमटू लागला आहे.
नवा पाकिस्तान उभारू म्हणणारे इम्रान खान हे शरीफ यांना चक्क “आता नवा इम्रान खान तुम्ही पाहाल’, अशी धमकी देऊन गेले. शरीफ कन्येच्या वयाचा संदर्भ घेत त्यांना “तरुण नानी’ म्हणत अशोभनीय टीका केली.विरोधकांच्या देशव्यापी रॅली व निदर्शनास त्यांनी सरकारविरोधातील बंडाची उपमा दिली. इम्रान खान सत्तेत असताना आज जसे वागत आहेत,कधी काळी शरीफ अन् मुशर्रफ देखील त्यांच्याशी असेच वागले होते.राजकीय सूडचक्र काळाने पूर्ण केले, असे म्हणावे लागेल.
शरीफ हे देखील एकेकाळी जनरल झिया या हुकूमशहाच्या आशीर्वादानेच राजकारणात स्थिरावले होते. आता त्याच व्यवस्थेला त्यांनी शिंगावर घेतले आहे. यात ते यशस्वी ठरले, तर त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरेल.अन् अपयशी झाल्यास लष्कराविरुद्ध बोलण्याचे पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही.
शरीफ यांच्या एका भाषणाने पाकमधील राज्यकर्त्यांचे आसन गदागदा हलले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे अनेक रहस्ये आहेत. यथावकाश ते उघड करू. लंडनमध्ये बसून राज्यकर्त्यांना नाकी नऊ आणणाऱ्या “एमक्यूएम’च्या अल्ताफ हुसेनपेक्षा शरीफ यांचा उपद्रव अधिक भयावह असेल. जनरल बाजवा यांनी नुकतीच ब्रिटनच्या सैन्य प्रमुखाची भेट घेऊन चर्चा केली. त्यात शरीफ यांना ब्रिटनमधून “डिपोर्ट’ करण्याचा मुद्दा असू शकतो. पाक सरकारने शरीफ यांच्यावरील सूडभावनेची कारवाई रोखली नाही, तर पाक पुन्हा आत्मघाताच्या वाटेवर चालला आहे, असेच म्हणावे लागेल.