पिंपरी – मोशी येथील महापालिकेच्या कचरा डेपोला बुधवारी (दि. 6) लागलेली आग ही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने शहरात राजकीय “आगडोंब’ उसळला आहे. भाजपधार्जिन्या ठेकेदारांना पोसण्यासाठी ही आग लावण्यात आल्याचा संशय राष्ट्रवादीसह काही सामाजिक संघटनांनी केल्याने वादाची ठिणगी पडली असून भारतीय जनता पक्षाने याबाबत अद्यापतरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही आग लागल्यानंतर काही तास अग्निशामक दलाला न कळविल्याने संशयामध्ये अधिकच भर पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी तर थेट भाजपवर निशाना साधत भ्रष्टाचार लपविण्यासाठीच ही आग लावल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केल्याने महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
आग लागली की लावली? चौकशी करा – अजित गव्हाणे
मोशी कचरा डेपोला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोठी आग लागली होती. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कचरा डेपोला आतापर्यंतची सर्वांत मोठी आग बुधवारी लागली. या कचरा डेपोचे व्यवस्थापन आरोग्य विभागामार्फत करण्यात येते.
तेथे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मोशी येथील कचरा डपोतील ठेकेदारी पद्धतीने सुरू असलेली कामे ही भाजपा आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांना दिले आहे. ठेकेदाराला मुदतवाढ देऊन पोसण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. तसेच ही आग भ्रष्टाचार लपविण्यासाठी लावण्यात आली का?, याची चौकशी करण्यासाठी तात्काळ समिती नियुक्त करावी.
करोना काळात कोणतीही कामे न करता या ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. सत्तेच्या जोरावर या ठिकाणी काम करणाऱ्या ठेकेदारांना मुदतवाढ देऊन ठेकेदार पोसण्याचे काम भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. चुकीची कामे करणाऱ्या ठेकेदारांना वाचविण्यासाठी आणि त्याद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत मोशी कचरा डेपोच्या माध्यमातून लुटलेली कोट्यवधींची माया दडपण्याचाही प्रयत्न या आगीच्या माध्यमातून केलेली असा आरोपही गव्हाणे यांनी केला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न
अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने या आगीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथे लाखो टन कचरा जमा होतो. त्याला आग लागल्याने धुराचे लोट पसरले आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन करोडो रुपये खर्च करते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी लागलेली आग ही नैसर्गिक होती की, हेतुपुरस्सर असा प्रश्न निर्माण झाल्याने या प्रकाराची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महासंघाचे शहराध्यक्ष उदयसिंह पाटील, गणेश नेवाळे, संजय देसाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे.