दि.3 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार
पुणे – मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गृह विभागाच्या पोलीस भरतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. दि.3 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून दि.23 सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे. प्रथमच भरती प्रक्रियेत गृह विभागाच्या वतीने मोठे बदल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच ही भरती होणार आहे. राज्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परिक्षेत्रात भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
यंदा होणाऱ्या भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. अगोदरच्या नियमांनुसार सुरुवातीला मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. दोन्हीचे गुण एकत्रित करून अंतिम यादी जाहीर केली जात असे. मात्र, यावेळी नवीन नियमांनुसार सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. लेखी परीक्षा अगोदरच्या नियमांनुसारच असणार आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 35 टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. तर, मागास प्रवर्गातील उमेदवारांना 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर लेखी परीक्षेतून एका जागेसाठी 10 जणांना मैदानी चाचणीला संधी दिली जाणार आहे. मैदानी चाचणीतदेखील बदल करण्यात आले आहेत. यंदा मैदानी चाचणी 50 गुणांची असणार आहे. तर, मुलांच्या मैदानी चाचणीतून लांब उडी व पुलअप्स वगळण्यात आले आहेत.
अशी आहे मैदानी चाचणी
मुले : 50 गुण
30 गुण 16 मीटर धावणे
10 गुण 100 मी. धावणे
10 गुण गोळाफेक
मुली : 50 गुण
30 गुण 800 मी. धावणे
10 गुण 100 मी. धावणे
10 गुण गोळाफेक