सोरतापवाडी (वार्ताहर) – हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या पोलीस पाटील यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक पोलीस ठाण्यात आयोजित केली होती.
प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्याकडून संपूर्ण माहिती घेण्यात आली व सर्व पोलीस पाटलांकडून आपापल्या गावातील कायदा व सुव्यवस्था व येणारी निवडणुक या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले. काही छोट्या-मोठ्या गोष्टी घडल्या तर लागलीच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ शंकर पाटील यांनी सांगितले.
निवडणुकी संदर्भात प्रत्येक गावातील बूथ व इमारती किती ठिकाणी आहेत याची माहिती देण्यात आली. जवळपास 1500 मतदानापर्यंत एक बूथ अशी व्यवस्था असणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही सूचना देखील पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिल्या.
यावेळी टिळेकर वाडीचे पोलीस पाटील विजय टिळेकर, पेठ गावचे दत्तात्रेय चौधरी, वळतीचे मोहन कुंजीर, कोरेगावमुळच्या वर्षा कड, खामगाव टेकच्या तनुजा थोरात, भवरापूरचे चंद्रकांत टिळेकर, पोलीस कर्मचारी राजकुमार भिसे उपस्थित होते.