पुणे (प्रभात वृत्तसेवा) – गावावरून घरी आल्यावर मौल्यवान वस्तू आणि कपड्यांची एक बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात येताच कोथरूड पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी प्रवासातील सर्व सीसीटीव्ही तपासत अवघ्या तासाभरात रिक्षाचा शोध घेऊन रिक्षामधील मागील बाजूस ठेवलेली बॅग मुळ मालकाला परत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कलोजिया (रा. राजीव गांधी पार्क, त्रिमुर्ती मित्र मंडळाजवळ, केळेवाडी) हे त्यांच्या कुटुंबासह गावाला उत्तरप्रदेशातील इलाहाबाद येथे गेले होते. तेथून पुण्यात पुणे स्टेशन याठिकाणी सकाळी दहा वाजता उतरून रिक्षाने राहते घरी आले. त्यावेळी मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि इतर कपडे असलेली एक बॅग रिक्षामध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ कोथरुड पोलीस ठाणे येथे माहिती दिली असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाने कलोजिया कुटुंब ज्या रिक्षामधून उतरले त्या ठिकाणचे आणि आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासले. तसेच पोउपनिरी कुलकर्णी यांनी डेक्कन, बावधन, पौड फाटा, पुणे स्टेशन, वारजे आणि कात्रज भागामध्ये सदर रिक्षाचा शोध घेण्यास आरटीओ येथून रिक्षाची माहिती घेण्यास सुरवात केली.
यावेळी डेक्कन भागात रिक्षाचा शोध घेताना सीसीटीव्हीवरून रिक्षाच्या नंबरप्लेटची मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अंमलदार वाल्किमी आणि राऊत यांनी रिक्षा दिसून आली. ती पोलिस स्टेशनला आणल्यावर रिक्षावाल्याकडे चौकशी केली असता रिक्षामध्ये बॅग असल्याबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी रिक्षात पाहणी केली असता, मागील बाजुस एक निळया रंगाची बॅग मिळून आली.
त्यामध्ये एक चांदीचे पैजन जोडी, तीन जोडी सोन्याची कानातील झुमके, एक जोड़ चांदीचे वाळे आणि रोख रक्कम असा एवज असलेली बॅग कलोजिया यांच्या ताब्यात देण्यात आली. दरम्यान, ही घटना तासाभरातील असल्यामुळे रिक्षामध्ये प्रवाशांची बॅग राहिल्याचे रिक्षाचालकाच्या लक्षात आले नाही.