कविता शेटे
24 टोळ्यांवर कारवाई; 169 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई, 152 तडीपार
सांगली – सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जिल्ह्यातील 24 टोळ्यांवर कारवाई करून जवळपास 169 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर 152 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच खून, खुनाचा प्रयत्न आणि चोरी या प्रकारामध्ये अल्पवयीन मुलांसह तरुणांचा सहभाग वाढला असून 345 बालगुन्हेगारांचे पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे एकमेकांची टिंगल-टवाळी करणे, चेष्टा-मस्करी करणे, मुलींची छेड काढणे यामुळे महाविद्यालयातील वातावरणात हमरीतुमरी होऊन मारामारीच्या घटना घडत आहेत. यातील बहुतांश घटना या प्रेमप्रकरणातून झालेल्या आढळतात. महाविद्यालयांमध्ये तरुणांच्या स्वयंघोषित टोळ्या निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी तर या सशस्त्र दिसून येतात. यांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे या घटना दररोज घडत आहेत. महाविद्यालयातील टिंगलटवाळी आणि टवाळखोरांचा बिमोड करण्यासाठी पोलिस दलाकडून निर्भया पथक, दामिनी पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिस उपअधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मिरज, तासगाव, विटा, जत, इस्लामपूर इत्यादी ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आहेत.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालय, शाळांमध्ये जवळपास पाचशे सखींनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सखीमार्फत पोलिस दलाला शाळा, महाविद्यालयातील टवाळखोरांची माहिती मिळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात सखी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
तसेच गंभीर गुन्हांमध्ये तरुणांचा सहभाग वाढला आहे. प्रेमप्रकरण आणि चेष्टामस्करी यातून सांगलीमध्ये सहा महाविद्यालयीन तरुणांकडून एकावर चाकू हल्ला करण्यात आला होता.
यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करून जतमधील मुचंडी येथे त्यांच्या डोकीत दगड घालून पेट्रोल ओतून मृतदेह पेटवून देण्यात आला होता. तर विट्यामध्ये पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी दोन तरुणांवर खूनी हल्ला केला होता. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळण्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 24 टोळ्यातील 169 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 152 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर 2019 मध्ये जिल्ह्यात घरफोडीचे 126 गुन्हे घडले असून त्यापैकी 60 टक्के गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे. वर्षभरात जिल्ह्यात चेन स्नॅचिंगचे 24 गुन्हे घडले आहेत. तसेच 28 अवैध पिस्तूल व 51 जिवंत काडसुते जप्त करण्यात आली आहेत.
बस स्थानक आणि मिरज रेल्वे स्थानक परिसरात अनेक तरुण गुन्हेगारांनी आपले बस्तान बसविले आहे. या ठिकाणी तरुणांकडून गांजा विक्रीचा देखील प्रकार घडत असून मिरज रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगारांनी गांजा विक्रीचे केंद्र बनविले आहे. त्यामुळे गांजा विक्री करणाऱ्या 106 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
345 गुन्हेगारांचे समुपदेशन
तरुणांची मानसिक संगोपन चांगल्या पद्धतीने होत नसल्याने त्यांचे संतुलन बिघडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुले सामाजिकदृष्ट्या असंतुलित राहतात. नैराश्य आणि हिंसकता यातून त्याच्या हातून गंभीर घटना घडत आहेत. गंभीर घटनांत सहभागी असलेल्या 345 अल्पवयीन तरुणांचे पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले आहे.