शिराळा – कुरळप, ता. वाळवा येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल साडेचार एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला असून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
येथील चौगुले मळा येथे मानसिंग धोंडीराम चौगुले 2 एकर 20 गुंठे, संजय काशिनाथ चौगुले 20 गुंठे, पांडुरंग काशिनाथ चौगुले 20 गुंठे, अधिक रघुनाथ चौगुले 20 गुंठे, अशोक चौगुले 20 गुंठे असे एकूण साडेचार एकर उसाचे क्षेत्र याठिकाणी आहे. यामधील काही शेतकऱ्यांची अडसाल लागण तर काहींचे खोडवा असे उसाचे पीक होते. या सर्व खातेदारांच्या ऊस क्षेत्राच्या ठिकाणावरुन महावितरणची विद्युत वाहिनी गेलेली आहे. विद्युत वाहिन्या लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. तसेच ढिल्या पडलेल्या अवस्थेत आहेत.
लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या एकमेकाला चिकटत होत्या. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन पार्किंग होत असलेले येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले होते. पार्किंगमुळे येथे विघातक गोष्ट घडू नये, म्हणून खबरदारी वजा या सर्व शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केलेली होती. तक्रारीतून लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या व्यवस्थित करून घेण्याची मागणीही करण्यात आलेली होती. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कडून या मागणीकडे कानाडोळा केला होता.
रविवारी दुपारी अचानक लोंबकळणाऱ्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन ठिणग्या ऊस क्षेत्रात पडल्या. भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे लगेच ऊसाने पेट घेतला. उसाचे सर्व क्षेत्र एकमेकाला लागून असल्याने एक सलग साडेचार एकर क्षेत्रातील ऊस काही वेळातच जळून खाक झाला. यामुळे पाच शेतकऱ्यांचे जवळपास सात ते आठ लाख रुपये नुकसान झाले असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. या जळीत झालेल्या ऊस पिकाचा महसूल यंत्रणेने पंचनामा केला.