कोची – प्रख्यात मल्याळी कवी विष्णूनारायणन् नंबुथिरी यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मल्याळी साहित्यात त्यांचे योगदान अजरामर मानले जाते.
थिरूवला येथे जन्मलेल्या नंबुथिरी यांच्या साहित्यात पुरोगामी आणि अंतर्विरोधी विचारांचे प्रतिबिंब पहायला मिळत असे. त्यांचे राहत्या घरी गुरूवारी दुपारी निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
त्यांना केरळ साहित्य अकादमीच्या पुरस्कारांसह अनेक साहित्य विषयक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंबुथिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य चिरंतन स्मरणात राहील, असे ते म्हणाले.