पुणे :- लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे जनक आणि बहुआयामी प्रतिभावंत होते. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आपण स्वातंत्र्याचा सूर्य अनुभवतो आहे. ते प्रखर राष्ट्रभक्त होते. ब्रिटींशांविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांना धार येत होती. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला देश निर्माण करण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे कार्य महत्वाचे आहे.
आज जग एक महत्वाचा नेता म्हणून मोदीजींकडे पाहत आहे. परदेशात त्यांना मिळणारा मान पाहून आम्हा देशवासियांना अभिमान वाटतो. अशा शब्दांंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोदींचं भरभरुन कौतुक केलं.
स.प. महाविद्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांना गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. ते समाजाचे, सामान्य माणसाचे मन ओळखणारे नेते आहेत. त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे सूत्र ठेऊन देशात सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या या कामाचा सन्मान आहे. मोठ मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून जात असताना भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
यावेळी खासदार पवार म्हणाले, यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला याचा आनंद आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. नव्या पिढीला या कर्तृत्ववान दृष्टीचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल.
स्वागत करताना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. टिळक यांनी लोकमान्य टिळक यांचे व्यक्तीमत्व आणि कार्य यांची ओळख करुन दिली. तसेच ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यामागील भूमिका विषद केली.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विशेष निमंत्रित व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.