भोपाळ :- भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहेय. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. बिहारमध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर टीका करताना मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधला आहे.
पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भोपाळमध्ये मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये “माझे बूथ, सर्वात मजबूत’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी विरोधी ऐक्याच्या बैठकीत समाविष्ट झालेल्या पक्षांवर असलेल्या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या संदर्भात उल्लेख केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घोटाळ्याबाबत टीका करताना मोदी म्हणाले, एनसीपीवरही जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी यांची यादीही मोठी आहे. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार असताना झालेल्या घोटाळ्यांचा दाखला देत मोदींनी टीका केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. तसेच, जनतेमध्ये संभ्रम पसरवून आणि खोटे आरोप लावून कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मोदींनी केला.
सध्या एक शब्द चांगलाच पसरवला जात आहे. तो शब्द म्हणजे “गॅरंटी’. वारंवार हा शब्द उच्चारला जात आहे. पण एकत्र विरोधक जमलेल्या विरोधकांची गॅरंटी ही किमान 20 लाख कोटींच्या घोटाळ्याची गॅरंटी आहे, अशी टीका मोदींनी केली.
कॉंग्रेस, लालू, ममतांवरही गंभीर आरोप…
मोदी यावेळी म्हणाले की, कॉंग्रेसचा घोटाळाच लाखो कोटींचा आहे. 1 लाख 86 हजार कोटींचा कोळसा घोटाळा, 1 लाख 74 हजार कोटींचा टूजी घोटाळा, 70 हजार कोटींचा राष्ट्रकुल घोटाळा यांचा समावेश आहे. सर्वच क्षेत्रात कॉंग्रेसने घोटाळा केला आहे. त्याशिवाय “राजद’वरही हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, असे ते म्हणाले.
चारा घोटाळा, अल कतरा घोटाळा, पशुपालन शेड घोटाळा राजदच्या घोटाळ्याची यादी एवढी मोठी आहे की, न्यायालयदेखील एकापाठोपाठ शिक्षा जाहीर करत आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीवरही 23 हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळ्याचा आरोप आहे. शारदा घोटाळा, रोझव्हॅली घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, गोतस्करी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा याचा उल्लेख मोदींनी केला. बंगालचे लोक हा घोटाळा कधी विसरू शकत नाही, असे मोदींनी म्हटले.