नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात’मधील प्रेरणादायी कथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यामुळे, देशभरातील विद्यार्थ्यांना “मन की बात’ कॉमिक्सच्या रूपात वाचायला मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या “मन की बात’वर आधारित प्रेरणादायी कथांचे 12 पुस्तके तयार करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला आहे. यातील पहिले पुस्तक तयार झाले आहे आणि लवकरच सर्व शाळांपर्यंत पोहचविले जाणार आहे. एनसीईआरटीने याचे डिजीटल पुस्तकही तयार केले आहे.
मंत्रालयातील सूत्रानुसार, अमर चित्रकथेच्या मदतीने या कथा कॉमिक्सच्या स्वरूपात तयार केले जाणार आहेत. हे कॉमिक्स इंग्रजी आणि हिंदीसह सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. हरियाणाच्या रोहतकमधील आयआयएमच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, पंतप्रधानांचा “मन की बात’ हा कार्यक्रम 23 कोटी लोक नियमितपणे ऐकतात. मात्र, देशातील 98 टक्के लोकांना या कार्यक्रमाबाबत संपूर्ण माहिती आहे.
दरम्यान, शालेय मुलांसाठी कॉमिक्सच्या रूपातील पहिल्या पुस्तकात मन की बातमधील प्रेरणादायी आणि मनोरंजक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. कलाप्रेमींच्या एका गटाने शहराच्या सुशोभिकरणासाठी शहरातील मुख्य भिंती कशा रंगवल्या आहेत, याचा उल्लेख आहे. यासोबतच पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या बनारसच्या राजूचीही कथा यात आहे.
अपंग असूनही राजू यांनी भीक मागून मिळालेल्या पैशातून कोरोनाच्या काळात लोकांना मदत केली होती. राजूने या पैशातून लोकांना मास्क आणि खाद्यपदार्थ दिले. अरुणाचल प्रदेशातील वाचनालयाचा विकास, शहरांमध्ये स्वच्छतेसाठी लोकांचे प्रयत्न आणि योगासने जोडून निरोगी कसे राहता येईल, आदींचा समावेश आहे. यामध्ये त्या लोकांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांनी या मोहिमेला छोट्याशा उपक्रमाने मोठे स्वरूप दिले होते.