कोलकाता: भारतातील सर्वात जुन्या आणि विशाल अशा कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारतीय क्रिकेट संघ ऐतिहासिक पहिलावहिला दिवस-रात्र कसोटी सामना 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान खेळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयकडून जोरदार तयारी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना या सामन्यासाठी निमंत्रण देण्यात येत आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात आल्याचे बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं आहे.
“आम्ही या कसोटी सामन्याचे एका शानदार सोहळ्यात रूपांतर करणार आहोत. येत्या तीन-चार दिवसांत तुम्हाला काय होणार आहे याबाबत सर्व माहिती मिळेल,’ असं गांगुली म्हणाले. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यात तीन टी-20 सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेनं होणार आहे.
या कसोटी सामन्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच पश्चिम बंगाल क्रिकेट संघाकडून बांगलादेशसोबत पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या संघाच्या सदस्यांनाही सन्मानित करणार आहे. त्यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तसेच पश्चिम बंगाल क्रिकेट संघाकडून भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, अभिनव बिंद्रा, एम. सी. मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आदींनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या “दिवस-रात्र’ कसोटीसाठी “बीसीसीआय’ने सहा डझन (72) “एसजी’ गुलाबी चेंडूंची ऑर्डर दिली आहे. अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही एसजी कंपनीचे चेंडू या कसोटीसाठी वापरले जातील, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चेंडू उत्पादक ‘एसजी’समोर कमी वेळेत दर्जेदार चेंडू तयार करण्याचे आव्हान आहे.