नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुर्व लडाख मधील सैन्य माघारी बाबत भारत आणि चीन यांच्यात जो करार झाला आहे, त्यात मोठा झोल झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदी घाबरट असून त्यांनी पुर्व लडाख मधील भारतीय भूभाग चीनला दान देऊन टाकला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी काल राज्यसभेत भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी समाझोत्या विषयी निवेदन केले आहे. त्यात त्यांनी पुर्व लडाख मधून भारत आणि चीन या दोन देशांनी सैन्य माघारीचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले असून दोन्ही देश त्या भागातून टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुर्व लडाख मधील तिढा संपला असल्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्यावर राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या या दाव्यावर जोरदार आक्षेप नोंदवला.
ते म्हणाले की पंतप्रधान मोदी चीनच्या दबावाखाली झुकले असून त्यांच्या घाबरटपणामुळे भारताला मोठा भूभाग गमवावा लागला आहे. ते म्हणाले की राजनाथसिंह यांनी केलेले निवेदन संदिग्ध आहे. भारतीय सैन्य पुर्व लडाखमधील फिंगर 3 पर्यंत मागे हटणार आहे. वास्तविक फिंगर 4 पर्यंत भारतीय भूभाग आहे. तेथे भारतीय लष्कराचे ठाणेही अस्तित्वात होते पण आता आपण फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंत मागे हटणार आहोत. मोदींनी हा आपला भूभाग चीनच्या घशात का जाऊ दिला असा थेट सवाल त्यांनी मोदी सरकारला केला आहे.
या प्रश्नाचे उत्तर संरक्षण मंत्र्यांनी देशाला द्यावे असे आव्हानही त्यांनी दिले. भारतीय लष्कराने मोठ्या कष्टाने कैलास रेंज पर्यंत आपली ठाणी मजबूत केली होती. तेथून भारताला सैन्य मागे घ्यायला सांगितले आहे. आणि भारत त्याला तयार झाला आहे. हा सरकारचा घाबरटपणा आहे.
हा भूभाग चीनला देऊन भारताला काय मिळाले असा सवाल करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देसपांग पठार हा लष्करी दृष्ट्या अधिक महत्वाचा भाग आहे. तेथून चीन माघार घेणार नाही. भारतीय भूभागाचे रक्षण करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पण मोदींना आपलाच भूभाग चीनच्या घशात जाऊ दिला आहे.