कोलंबो – श्रीलंकेचे क्रिकेटपटू सध्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अन्य गोष्टींमध्येच रमले आहेत. सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला असून, त्यांना देशाकडून खेळताना किती गांभीर्य दाखवावे लागते हेच ते विसरलेले दिसतात. कधी कधी तर असे वाटते घरातील लहान मुलांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी ज्या प्रकारे त्यांना दरडावले जाते, तसेच या खेळाडूंनाही चांगली अद्दल घडवायला हवी, अशा शब्दांत श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
श्रीलंका संघाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी होत आहे. जगभरातील अन्य खेळाडूंप्रमाणे या खेळाडूंनाही सर्वोत्तम सुविधा मिळतात, चांगले मानधन मिळते. मात्र, तरीही त्यांची कामगिरी सरस होत नाही. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे क्रिकेट सोडून अन्य गोष्टींमध्येच हे खेळाडू रमताना दिसतात.
श्रीलंका क्रिकेटचे कधी नव्हे इतके नुकसान सध्या झालेले आहे व त्याला खेळाडूंसह क्रिकेट मंडळही तितकेच जबाबदार आहे, असे ताशेरेही रणतुंगा यांनी ओढले आहेत. इंग्लंडमध्ये बायोबबलचा नियम मोडून काही खेळाडू हॉटेलबाहेर गेले, तिथे मद्यपान तसेच धूम्रपानही केले. गैरवर्तन करणाऱ्या या खेळाडूंना कोणतीही दयामाया न दाखवता चांगली अद्दल घडवायला हवी, असे विधानही रणतुंगा यांनी केले आहे.
सध्याच्ये क्रिकेटपटू हे क्रिकेट सोडून सर्व काही करताना दिसतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकताना दिसतात. या खेळाडूंचे क्रिकेटवरचे लक्ष उडालेले आहे. त्यांना सुधारण्यासाठी जे काही करणे शक्य आहे ते केले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.