मुंबई – राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली श्रीलंकेत दाखल झालेल्या भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नसल्याचे संकेत खुद्द निवड समितीच्याच एका सदस्याने दिले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कितीही सरस कामगिरी केली तरीही त्याच्याऐवजी लोकेश राहुलच्याच नावाला पसंती मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये व्यस्त असून, दुसरा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. या मालिकेत धवनने सरस कामगिरी केली तरीही मुख्य संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, मयंक आग्रवाल व लोकेश राहुल असताना धवनला संधी मिळण्याची शक्यताच संपुष्टात आली आहे.
जेव्हा धवनला टी-20 सामन्यात संधी दिली, तेव्हा एका सामन्यानंतर त्याला संघातून बाहेर जावे लागले होते. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिली लढत धवन खेळला, पण या सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर राहुलला संधी देण्यात आली. धवनने काहीतरी चमत्कार केला तरच टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याच्या नावाची चर्चा होईल, अन्यथा त्याला श्रीलंकेतील मालिकेतून काहीही हाती लागणार नाही, असे मत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे.
धवनला टी-20 क्रिकेटमध्ये आजवर फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. 63 टी-20 सामन्यांत त्याने 27.88 च्या सरासरीने 1 हजार 673 धावा केल्या आहेत. दुसरीकडे राहुलने 45 टी-20 सामन्यांत 39.92 च्या सरासरीने 1 हजार 557 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकांचा समावेश असून, स्ट्राईक रेट 142.19 आहे. त्यामुळे धवनऐवजी राहुलच्याच नावाला पसंती मिळण्याची शक्यता जास्त आहे.