बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवडीला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना रोप मिळेनासे झाले आहे. कांद्याचे रोप दुपटीने महाग झाल्याने शेतकऱ्यांवर कर्ज काढून शेती करण्याची वेळ आली आहे.
करोनामुळे शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता; जेव्हा कांद्याला बाजारभाव वाढला तेव्हा साठवून ठेवलेला कांदा पूर्णपणे सडला. हा कांदा फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली. तरी यामधून सावरून शेतकऱ्यांनी या वर्षी लागवडीला सुरुवात केली आहे; परंतु कांदा रोप 20 ते 22 हजार रुपये एकरी मिळत आहे. एरव्ही 10 ते 12 हजार रुपये मिळणारे रोप पावसामुळे शेतकऱ्यांना दुपटीने विकत घ्यावे लागत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, जाधववाडी, बोरी, साळवाडी भोरवाडी, शिरोली, सुलतानपूर, वडगाव, कांदळी, चाळकवाडी, उंचखडक या गावांमध्ये मोठ्या क्षेत्रावर कांद्याच्या लागवडी होत असतात. याही वर्षी लागवडीला सुरुवात झालेली आहे; परंतु बहुतेक शेतकरी बेड पद्धतीने लागवडी करताना दिसून येत आहेत. कारण बेड पद्धतीने लागवडी केल्यास पिकाला पाणी पण कमी द्यावे लागते व ते भरावे पण लागत नाही. याला फक्त ठिबक सिंचनचा वापर करावा लागतो.
शिवाय कमी व प्रमाणात पाणी दिल्याने कांदा देखील चांगला येतो आहे. तर सारा पद्धतीने लागवड केल्यास साऱ्यात जास्त पाणी साचल्याने कांदा फुगतही नाही व जास्त पाण्यामुळे कांदेही खराब होतात. यामुळे शेतकऱ्यांचा बेड पद्धतीने लागवड करण्याकडे कल वाढला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणात होणाऱ्या हवामानामुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे सडून गेलेली असल्यामुळे कांद्यांच्या रोपांचे भाव देखील गगनाला भिडलेले आहे.