संगमनेरमधील आशी खुर्द शिवारातील घटना; वाड्या-वस्त्यांवरील शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील पिंप्री फाट्यालगत प्रा. कान्हू गिते यांच्या वस्तीवर सोमवारी (दि.7) मध्यरात्री बिबट्याने हल्ला करुन सात शेळ्या ठार केल्या. यामध्ये चार बोकड व तीन शेळ्यांचा समावेश असून, सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
आश्वी खुर्द शिवारातील पिंप्री फाट्यालगत गट क्रमांक 133 मध्ये प्रा. कान्हू गिते यांची वस्ती आहे. सोमवारी रात्री पाऊस व वारा सुटल्यामुळे गिते यांनी शेळ्यांच्या गोठ्यात जाऊन पाहणी केली असता सर्वकाही ठीक होते. परंतु पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने गिते यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता, चार बोकड व तीन शेळ्या या मृतावस्थेत आढळून आल्या. गिते यांचा शेळ्याचा गोठा हा लोखंडी जाळीने बंदिस्त आहे. मात्र तरीही पत्र्याच्या बाजूने असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने आतमध्ये प्रवेश करून सात शेळ्या ठार केल्या.
आज सकाळी प्रा. गिते यांनी वनविभागाला या घटनेबाबत माहिती दिली. गिते यांचे अंदाजे 80 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे वनविभागाने गिते यांना तत्काळ अर्थिक मदत करावी. तसेच या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरा पंचनामा केला.
वीस वर्षांपूर्वीची पुन्हा आठवण
सुमारे वीस वर्षांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात याच वस्तीपासून काही फूट अंतरावर एका सहा वर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली होती. या घटनेनंतर नगर जिल्ह्यात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी बिबट्याने सात शेळ्या ठार केल्याने त्या कुटुंबाच्या जखमा आजही ताज्या असल्याचे दिसून आले.