दिवे-दिवे परिसरात पावसाळी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र मजुरांच्या टंचाईमुळे काही ठिकाणी लागवड रखडली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे जमिनीच्या मशागतीला वेळ मिळाल्याने शेतकऱ्यांनी वाफे तयार करून कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र, मजूरांचा तुटवडा जाणवत असल्याने बाहेर गावातून मजूर आणून कांदा लागवड केली जात आहे.
यावर्षी बियाण्यांची कमतरता असल्याने भाव गगनाला भिडले आहेत, अशातच मधल्या काळात झालेल्या अतिवृष्टिमुळे कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाल्याने 50 टक्केच कांदा रोपे उपलब्ध आहेत, त्यामुळे रोपांची सुद्धा कमतरता भासत आहे. कांद्याच्या बाजारभावात वेळोवेळी होणारे चढउतार आणि उत्पादन खर्च जास्त त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळवून देणारे पीक आता बेभरवशाचे झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.