पिरंगुट -करोनाचा सामना आता प्रत्येकाला ज्याचा त्यानेच करावा लागणार आहे. हे जाणूनच पिरंगुट (ता. मुळशी) ग्रामपंचायतीने “आत्मनिर्भरते’कडे पाऊल टाकून करोनाला रोखण्यासाठी उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे पिरंगुट ग्रामपंचायत याबाबतीत आदर्श उदाहरण ठरत असून, त्याची कार्यवाही इतर सर्व ग्रामपंचायतींनीही करणे गरजेचे आहे.
पिरंगुट ग्रामपंचायतीच्या हद्दीत परगावाहून आलेल्या व्यक्तींची ग्रामपंचायत कार्यालयात माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार त्या व्यक्तींना 14 दिवस घरीच क्वारंटाईन करण्यात येत असून, त्यांची आधी जरी वैद्यकीय तपासणी केली असेल तरीही ग्रामपंचायत पुन्हा वैद्यकीय तपासणी ग्रामपंचायत कार्यालयात करीत आहे. या नागरिकांनी स्वतःला 14 दिवस घरच्यांपासूनही विलगीकरण राखूनच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरून अनाहुतपणे येणारा करोनाचा विळखा रोखण्याच्या दृष्टीने ही पध्दत अतिशय योग्य आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी ठरणार आहे.
सोमवारी (दि. 18) बाहेरून आलेल्या नागरिकांच्या तपासणीवेळी सरपंच चांगदेव पवळे, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजने, माजी उपसरपंच महादेव गोळे, रामदास गोळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, विकास पवळे, श्री शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवळे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. मेघना पवार आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात अधिक जागरूकता गरजेची
सरकारने लॉकडाऊन शिथिल करताच विविध कंपन्या, कारखाने, विविध व्यावसायिक दुकाने चालू झाली आहेत. नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची मुभाही देण्यात आली आहे, त्यामुळे स्थलांतरितांचे प्रमाण वाढले असून अनेक नागरिक रेड झोनमधूनही आपल्या मूळ गावी येत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या अतिदक्षता विभागातूनही लोक गावाकडे येत आहेत, त्यामुळे करोनाला रोखण्यासाठी ग्रामीण भागाने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, म्हणूनच पिरंगुट ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे.
परगावहून आल्यावरही होणार तपासणी
ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र करोना कक्ष उभारून तेथे परगावाहून आलेल्या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना करण्यात येत आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत या चौकशी कक्षात ग्रामपंचायतीचे राम गोळे व राहुल जाधव यांच्याकडे माहिती संकलित करण्यात येत आहे. परगावाहून आलेल्या व्यक्तीची पुन्हा वैद्यकीय तपासणी डॉ. मेघना पवार यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येत आहे. थर्मल गनने तपासणी करून, तसेच इतर सविस्तर माहितीही कार्यालयातील संगणकावर नोंदली जात आहे.
घराच्या दरवाजावर “क्वॉरन्टाइन पत्र’ परगावहून आलेल्या संबंधित व्यक्तीस क्वॉरन्टाइनचे पत्र देण्यात येणार असून हे पत्र त्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर लावणे बंधनकारक राहणार आहे. त्या व्यक्तीस व त्याच्या कुटुंबियांना 14 दिवस कोणालाही भेटता येणार नाही. क्वॉरन्टाईन व्यक्ती 14 दिवसांत गावात फिरल्यास किंवा आढळून आल्यास जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अथवा पोलीस स्टेशनला पुराव्यासह तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. क्वॉरन्टाईन व्यक्तीस “आरोग्य सेतू’ ऍप डाऊनलोड करणे बंधन राहणार आहे. परगावाहून आलेल्या व्यक्तीच्या खासगी वाहनाचे ग्रामपंचायत कार्यालयात निर्जंतुकीकरण करून घेणे बंधनकारक राहणार आहे. पुढील काळात आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क करणे अपेक्षित आहे.