नीरा -लग्न घरातील व्यक्ती करोना बाधीत असल्याचा अहवाल येऊनही मायणी (ता. खटाव) येथून मंगळवारी (दि. 19) वऱ्हाडी मंडळी सगळ्यांचे जीव धोक्यात घालून गुळुंचे (ता. पुरंदर) येथे विवाहासाठी आले होते. मात्र, संबंधित जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्हा प्रशासनाला ही माहिती तातडीने कळविली.
मात्र, दोन्ही बाजुंच्या लोकांनी विवाहाला परवानगी असल्याचे सांगत सकाळी साडे दहा वाजताच विवाह आटोपला. या घटनेने संपूर्ण जिल्हा तसेच तालुक्यात खळबळ उडाली. करोना बाधीत व्यक्ती वऱ्हाडी मंडळींच्या संपर्कात आली असल्याने आता दोन्ही पक्षांकडे करोना संशयित रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सकाळी सहा वाजता मायणीहून वऱ्हाड निघालं पाडेगाव टोलनाका साडेसात वाजता ओलांडला. याच लोकांच्या घरातील एक व्यक्ती आजारी असल्याने त्याची करोना तपासणी केली होती. मंगळवारी सकाळी त्याचा रिपोर्ट येणार होता. त्यापुर्वीच वऱ्हाडी मंडळी नीरेत पोहचली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यावर प्रशासनाने संबंधितांना संपर्क सधण्याचा प्रयत्न केला.
मात्र संपर्क होऊ शकला नाही. तेथील प्रशासनाने चौकशी केली असता रूग्णाच्या कुटुंबातील विवाह असल्याचे समजले. त्यानंतर खंडाळा व पुरंदर प्रशासनाशी संपर्क करून माहिती देण्यात आली. त्यामुळे सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासन सजग झाले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना पुरंदरच्या प्रशासनाने नवरदेव सोडून माघारी जाण्याची विनंती केली. आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत साडेबाराच्या मुहूर्ताच लग्न साडेदहा वाजताच लागलं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याला पन्नास माणसात लग्न लावण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती. आज नीरा नजिकच्या एका मोठ्या व प्रतिष्ठित गावात एका प्रतिष्ठित कुटुंबातील विवाह सोहळा होता. वास्तविक हा विवाह सोहळा दि. 30 मे रोजी होणार होता पण तो मंगळवारी (दि. 19) मे ला घेण्यात आला. मायणी येथील वर व पुरंदर तालुक्यातील वधू यांचा विवाह थोडक्या लोकांत छोटेखानी कार्यक्रम नियोजित होता. मायणी येथून वऱ्हाड पहाटे सहा वाजता निघाले.
सात वाजता वराच्या कुटुंबातील सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. ती व्यक्ती वऱ्हाडात नव्हती. पण ते मागील काही दिवसांपासून या वऱ्हाड्यांच्या संपर्कात होते.गुळुंचे परिसरात अद्यापही करोनाचा रुग्ण नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे.
रिपोर्ट सकाळी सहा वाजता आला आणि शासनाचे लोक घरी जाईपर्यंत हे वऱ्हाड निघाले होते. पुरंदर प्रशासनाने तातडीने जाऊन समजूत काढत लग्न सोहळा उरकून घेतला. संबंधित संपर्कातील लोकांना होम क्वारंटाइन किंवा प्राथमिक शाळेत ठेवण्यात येईल. आरोग्य विभागाशी बोलणे करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
– रुपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर.