पिंपरी – जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी (दि.5) घेतलेल्या शटडाऊनमुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागातील पाणीुपरवठा अजूनही सुरुळीत झालेला नाही.
काळेवाडीसह शहरातील काही भागांमध्ये बुधवारपासून पाणी येत नसल्याने टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर आली आहे. देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरूवारी (दि.5) शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पवना नदीतून पाणी उचलण्यात आले नाही. शुक्रवारचा सकाळचा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार होता.
मात्र, एक दिवसाआड पाणी असल्याने काही भागाला मंगळवारी पाणी पुरवठा झाला होता. यावेळी अधिक पाणी पुरवठाही करण्यात आला. मात्र, या भागाला गेल्या चार दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांची ओरड सुरू झाली होती. प्रामुख्याने काळेवाडी, कासारवाडी, चिंचवडगाव यासह काही भागाला टॅकरने पाणी पुरवठा करावा लागला.
शटडाऊनमुळे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. शटडाऊन घेतले की जलवाहिनीव्दारे एकदम पाणी सोडता येत नाही. जलवाहिनीमध्ये प्रेशर निर्माण होते. त्यामुळे जलवाहिनीमधील हवाही वेळोवेळी काढावा लागते. आवश्यकतेनुसार काही भागातील नागरिकांना टॅंकरव्दारे पाणी देण्यात आले आहे. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल. – अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग