सातारा -“”मी प्रांत, कलेक्टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. मी तालुक्यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. नादाला तर अजिबात लागू नका. नादाला लागल्यावर कोण कुठे असतो याची माहिती घ्या. तुमच्या पुस्तकात काय आहे ते लवकरच बाहेर काढू, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना दिला.
दहिवडी येथील भाजप कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, “”जनतेने देशमुखांना मागच्या निवडणुकीत घरी बसवले आहे. त्यांनी घरात आनंद घ्यावा. या वयात न झेपणाऱ्या भानगडी करु नयेत. मला अनेक वेळा अडकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते अडकले तर त्यांना या वयात झेपणार आहे का याचा विचार करावा. मी राजकारणातून काही कमवले नाही. पण कुणी काय आणि कोणत्या उचापती करुन करोडोंची माया कमवलीय ते लवकरच बाहेर येणार आहे. मी आणलेल्या पाण्यावर देशमुखांनी त्यांचा ऊस भिजवायला आतापर्यंत किती वेळा पाणीपट्टी भरली ते एकदा जनतेसमोर जाहीर करावे.”
जिहे कठापूर योजनेच्या आंधळी बोगद्याचे काम रणसिंवाडी, वेटणे या गावांना पाणी देण्यासाठी थांबले होते. तो प्रश्नही आम्हीच मार्गी लावला आहे. आता लवकरच बोगदा पूर्ण होऊन पाणी माणमध्ये येणार आहे. आंधळी उपसा योजनेतून 32 तर आता झालेल्या फेरपाणीवाटपातून उर्वरित 18 गावांना पाणी देतोय. या योजनेची मंजूरी फडणवीसांची असताना देशमुख ती जयंत पाटलांनी दिल्याचे धडधडीत खोटे सांगत आहेत.
जयंत पाटलांनी ही योजना रखडवण्याचे पाप केले आहे, असे गोरे यांनी स्पष्ट केले. टेंभू योजनेतून 44 गावांना अडीच टीएमसी पाणी देतोय. त्याचा शब्द 2019 मध्ये दिला होता. अडीच वर्षे बेइमानांचे सरकार नसते, देशमुखांसारखे पाणी अडवणारे लोक नसते तर हे पाणी अगोदरच आले असते. देवेंद्र फडणवीस यांनी माणमध्ये येऊन जनतेला जे जे शब्द दिले ते ते आम्ही पूर्णत्वाला नेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मी सुरुवातीपासून दुष्काळ हटविण्यासाठी कार्यरत आहे. प्रत्येक निवडणुकीत विविध योजनांचे पाणी आणण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करत आलो. जनतेला दाखवलेले स्वप्न आणि दिलेला शब्द पूर्ण करत पुढे चाललो आहे. जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे ऐऱ्यागैऱ्याच्या फेकाफेकीला कवडीचीही किंमत देत नसल्याचे आ. गोरे म्हणाले.
सत्तेच्या अडीच वर्षातील एक काम दाखवा…
देशमुखांनी पाणी मंजूर झालेले नसताना फ्लेक्स लावले, गावागावात पेढे वाटले होते. त्या लबाडाने जनतेची दिशाभूल केली होती. तेव्हा मंजूर झाले होते तर आता निघालेले धडधडीत आदेश कशाचे आहेत?, पाणी योजना मंजूर करुन आणणे, विकासकामे करुन घेणे ही त्यांची पात्रताच नाही. त्यांनी त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळातील एक काम सांगावे, असे खुले आव्हान त्यांना दिले आहे. जनाची नाही मनाची तरी त्यांनी बाळगावी. निर्लज्जासारखे जनतेला चुकीचे सांगून भूलथापा मारु नयेत, असा टोलाही आ. गोरे यांनी लगावला.