गणेश विसर्जनावरून संतापाची लाट : मूर्ती विसर्जित होण्यात अडथळे
पोलीस करताहेत भाविकांच्या रोषाचा सामना : हिंदू संघटनांकडून महापालिकेचा जाहीर निषेध
गणेश भक्तांकडून अडगळीच्या ठिकाणी होते नदीत विसर्जन
एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण?
पिंपरी – गणेश विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा कृत्रिम हौदात करण्यास महापालिकेने मनाई केली आहे. तसेच पर्यायी व्यवस्थाही महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दारूचे दुकान, मंडई किंवा बाजारपेठेत झालेली गर्दी महापालिकेला चालते. मात्र विसर्जन घाटावर होणारी गर्दी का चालत नाही, असा सवाल गणेशभक्त करीत आहेत.
करोना प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाच्यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांकडून अत्यंत साधेपणाने आणि भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. तसेच पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू असल्याने यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुका होणार नाहीत, परिणामी विसर्जन घाटावरील गर्दीदेखील कमी असणार आहे. दीड, अडीच, पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जनाची परंपरा आहे. मात्र महापालिकेने करोनाचा प्रसार होईल, या भितीने शहरातील सर्व घाटांवर गणेश विसर्जन करण्यास मनाई केली आहे. तसेच याबाबतची पुरेशी माहितीही नागरिकांना नाही.
घाटावर जाण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत आहे. यामुळे हिंदूत्ववादी संघटना आणि गणेश भक्तांच्या रोषाला पोलिसांना जावे लागत आहे. रविवारी पोलीस आणि गणेश भक्त यांच्यात खटके उडताना दिसत आहेत. शहरातील काही नगरसेवकांनी वाहनावर तात्पुरता हौद तयार केला आहे. मात्र हा हौद किती जणांना पुरणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. यामुळे घाटावरून विसर्जनासाठी जाता येत नसल्याने अनेक भाविक पाऊल वाटेने नदीकडे जाताना दिसतात. सध्या पावसामुळे नदीच्या पाण्याला प्रवास जादा आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न भाविक विचारत आहेत.
दारुच्या दुकानांपुढील गर्दी चालते?
दीड दिवसाचे गणपती पालिकेने सांगितलेल्या उपायांनुसार विसर्जित होत नसल्याचे कळताच भाविकांमध्ये असंतोष पसरु लागला आहे. इतर महापालिकांनी जशी पर्यायी व्यवस्था केली, तशी व्यवस्था करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिका अपयशी ठरली आहे. यामुळे आता हिंदुत्ववादी संघटनांसोबत राजकीय पक्ष देखील पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करु लागले आहेत. परंतु सत्ताधारी भाजप मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दारूची दुकाने, मंडई आणि व्यापारी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या गर्दीतून करोनचा प्रसार होत नाही कारण त्यातून महापालिकेला महसूल मिळतो. मात्र विसर्जन घाटावर होणाऱ्या गर्दीतून महसूल मिळणार नसल्यानेच महापालिकेने विसर्जनावर बंदी आणल्याची भावना हिंदूत्ववादी संघटना व्यक्त करीत आहे. पाचव्या, सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी गणेश विसर्जन करणाऱ्यांची संख्या जादा असते. जर महापालिकेने विसर्जन घाट किंवा पर्यायी व्यवस्था न केल्यास नागरिकांच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशाराही हिंदूत्ववादी संघटनांनी दिला आहे.
बाप्पांना असा निरोप?
दीड दिवसांच्या बाप्पांना रविवारी भाविकांनी निरोप दिला. पालिकेने सांगितल्याप्रमाणे अनेकांनी घरच्या-घरीच विसर्जन केले. परंतु सोमवार सायंकाळपर्यंत देखील मूर्ती विसर्जित होत नव्हत्या. ज्या बाप्पांना मोठ्या आनंदात घरी आणले, मनोभावे पूजा केली, त्यांना बादलीत किंवा टबात ठेऊन त्याच्यात रसायन ओतणे भाविकांसाठी खूपच कष्टदायक ठरत आहे.
पालिका केवळ आदेश देऊन मोकळी झाली. अनेक विक्रेत्यांनी शाडू किंवा पीओपी आणि शाडू मिक्स असल्याचे सांगून भाविकांना गणेशमूर्तींची विक्री केली. आता या मूर्तींचे विसर्जन करताना भाविक रडकुंडीला आले आहेत. काही ठिकाणी नगरसेवकांकडून सोडियम बाय कार्बोनेटची पाऊडर विसर्जनसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र ज्या गणेशाच्या मूर्तीची भक्ती भावाने पूजा केली त्यावर रसायन टाकून ती नष्ट करणे, योग्य नसल्याचे भावना गणेश भक्तांकडून व्यक्त होत आहे.