- पुनर्वसनासंदर्भात गांधीनगर रहिवासी संघर्ष समितीचे केंद्रीयमंत्री आठवलेंकडे तक्रार
पिंपरी – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीच्या पुनर्वसनात स्थानिक रहिवाशांच्या जीवनमान उंचाविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. महालिका प्रशासनाकडून केवळ जागामालक आणि बांधकाम व्यावसायिकाचे हित जोपासले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे साकडे गांधीनगर रहिवासी संघर्ष समितीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना घातले आहे.
गांधीनगर येथील माजी नगरसेवक स्व. लक्ष्मण गायकवाड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले गांधीनगर (पिंपरी) येथे रविवारी (दि.27) आले होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत, विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पात 550 चौरस फुटांची सदनिका देण्यात यावी. मात्र, महापालिका प्रशासन तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून जागा मालक आणि बांधकाम व्यावसायिकाच्या हिताला प्राधान्य देत, या प्रकल्पात केवळ 300 चौ. फुटांची सदनिका देण्याचे प्रस्तावित आहे. याला सर्वच रहिवाशांचा विरोध आहे.
याठिकाणी दलित, शोषित व कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. हा प्रकल्प साकारत असताना, स्थानिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यावसायिक गाळ्यांचे नियोजन करुन, ते रहिवाशांना प्राधान्याने वितरित करावेत. या प्रकल्पात व्यावसायिक गाळ्यांबरोबरच मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली धार्मिकस्थळे, उद्यान, शाळा, दवाखाना, व्यायामशाळा, क्रीडांगण, विरंगुळा केंद्राचा देखील समावेश असावा.
आरपीआयच्या स्थानिक नेतृत्वाकडून केलेल्या या सर्व मागण्यांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करत, समितीच्या अर्ज-निवेदनांनादेखील केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे या पुनर्वसन प्रकल्पात आपण जातीने लक्ष घालाण्याची विनंती या निवेदनात केली आहे. यावेळी दिलीप साळवे, प्रल्हाद कांबळे, लक्ष्मण कांबळे, आप्पा जोगदंड, वंदना यंकुळे, सज्जनाबाई गायकवाड, छबू कांबळे, तुकाराम वडमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
आरपीआयमध्ये सक्रीय असलेल्या काही कार्यकर्त्यांचे गेल्या काही महिन्यांत अकाली निधन झाले. रविवारी पुण्यातील नियोजित कार्यक्रमाला जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निगडीतील स्व. श्रीरंग जकाते, आनंदनगरमधील स्व.एम. पी. कांबळे, लालटोपीनगरमधील आत्माराम शिरोळे व गांधीनगरमधील माजी नगरसेवक स्व. लक्ष्मण गायकवाड यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.