20 जूनपर्यंतच आवक : ‘रत्नागिरी’, “देवगड’च्या दरात घसरण
पिंपरी – यंदाच्या मोसमातील हापूस आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जून महिन्याच्या 20 तारखेपर्यंत आंब्याची आवक सुरु राहण्याची शक्यता आहे. तसेच, मागील आठवडाभरापासून बाजारात कर्नाटकी हापूसची मागणी वाढली असून रत्नागिरी व देवगड हापूसच्या दरात घसरण झाल्याचे, व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून रत्नागिरी व देवगड हापूसच्या तुलनेत कर्नाटकी आंब्यांला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या बाजारात कर्नाटकी हापूसची आवक टप्प्या-टप्प्याने होत आहे. आंब्याच्या सुरुवातीच्या मोसमात रत्नागिरी व देवगड हापूसचा दर 900 ते 1400 रुपये डझन होता. मात्र, सध्या रत्नागिरी व देवगड हापूसच्या दरात घट झाली असून मागील आठवडाभरापासून 400 ते 450 रुपये डझन आंब्याचा दर आहे. तसेच, आंब्याच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांकडून केशर, तोतापुरी, पायरी या आंब्यानाही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
सध्या उष्णता प्रचंड असल्याने आंबा लवकर परिपक्व होत आहे. यामुळे, सद्यस्थितीत बाजारात तयार आंबे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला आंबे तयार होण्याची प्रक्रिया सुरु असल्याने आंब्याच्या चवीमध्ये फरक जाणवत होता. मात्र, हापूसच्या अखेरच्या टप्यात आंब्यांची प्रतिवारी चांगली असून चवीलाही आंबे गोड आहेत.