पिंपरी,(प्रतिनिधी) – उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे. पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यापुढे अशाप्रकारचा ‘उद्योजकांचा मेळा’ प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल. शासनाच्यावतीने उद्योजकांना उद्योगपुरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 1 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल, असेही तेम्हणल
यावेळी उदय सामंत यांच्या हस्ते ‘एक्सपोर्ट पॉलिसी 2023’ या पुस्तिकेचे विमोचन तसेच निर्यातभिमूख उत्पादनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दालनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.
उद्योगवाढीसाठी मैत्री संकेतस्थळ: : कांबळे
डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, राज्यात परकीय गुंतवणूकीमध्ये वाढ झाली पाहिजे, उद्योगामध्ये वाढ झाली पाहिजे, याकरीता उद्योग विभागाच्यावतीने काम करण्यात येत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी लागणार्या परवान्यासाठी ‘मैत्री’ संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून आवश्यक त्या सर्व परवानग्या विहित मुदतीत देण्यात येत आहे. राज्यात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने सूचना असल्यास उद्योग विभागाला कळवावे, असे आवाहन कांबळे यांनी केले. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी प्रास्ताविकात जिल्हानिहाय निर्यातक्षम उपक्रमाची माहिती दली.विपीन शर्मा यांनी राज्याची उद्योग क्षेत्रातील कामगिरीबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.