शिक्रापूर – शिरूर आणि खेड तालुक्याच्या चार गावांतील सेझच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या सुमारे चार हजार एकर जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के येत्या 21 दिवसात काढण्यात येतील, असा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबई येथे बैठकीत जाहीर केला.
पाबळसह खेड तालुक्यातील पूर, वरुडे, वाफगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्र्यांच्या समवेत मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिरूर आंबेगावचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखीले, खेड उपतालुकाप्रमुख संतोष गार्डी, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब जवळेकर, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, नितीन कराळे, वरुडेचे सरपंच मारुती थिटे, पाबळचे ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे, विठ्ठल तांबे, मुरली जाधव, गोसासीचे सरपंच संतोष गोर्डे, बापू दौंडकर, युवा सेनेचे बापू शिंदे, विशाल पोतले, सतीश फुटाणे, बाळासाहेब माशेरे, पोपटराव गोडसे यांसह आदी उपस्थित होते.
सेझच्या पहिल्या टप्प्यामध्ये कनेरसर, निमगाव दावडी, गोसासी गावातील सुमारे पाच हजार एकर जमिन संपादित करण्यात आलेली असून या ठिकाणी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. तर यानंतरची केआयपीएल या कंपनीने सेझच्या दुसऱ्या टप्प्यातील जमीन घेण्यासाठी नकार दर्शविला होता. यानंतर सुमारे पंधरा वर्षांपासून या चार गावांतील शेतकरी जमिनीवरील शिक्के काढण्याची मागणी सातत्याने राज्य शासनाकडे करत होते. यानंतर समितीने देखील राज्य शासनाला शिक्के काढण्याबाबतचा सकारात्मक अहवाल दिला होता. मात्र राजपत्रात निर्णय प्रसिद्ध होण्याअभावी हा निर्णय कित्येक वर्षापासून थांबलेला होता. अखेर उद्योगमंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत एसईझेडचे शिक्के काढण्याचा निर्णय घेतला.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून जातीने लक्ष घालून सर्व प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिली.