पुणे{प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री जॉन बार्ला आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले होते, त्यांनी या दौऱ्यात शहरातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. २०४७ पर्यंत विकसित आणि आत्मनिर्भर भारत उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने गरीब कल्याणच्या अनेकविध योजना आणल्या असून त्या देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बार्ला यांनी सांगितले.
भारताच्या आजवरच्या जडणघडणीत अल्पसंख्यांक समाजाचा वाटा मोलाचा राहिला आहे. मात्र, आगामी अमृत काळात देशाला खऱ्या अर्थाने विकसित आणि आत्मनिर्भर बनवायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे लागेल. सध्या, संपूर्ण देश पातळीवर हीच मोहीम राबवली जात असल्याचे जॉन बार्ला यांनी स्पष्ट केले. पुण्याचे बिशप थॉमस डावरे यांच्यासह अल्पसंख्यांक समाजाचे अनेक नेते आणि अन्य प्रतिनिधी या संवादात सहभागी झाले होते.