पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्यासाठी चिखली येथे २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रस्तावित आहे. मात्र हे केंद्र सुरू करण्याची कार्यवाही संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या सुटणार कशी असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्िथत करत आहेत.
आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी, १०० एमएलडी पाणी शहरात येत आहे. पाण्याची अतिरिक्त गरज पूर्ण करण्यासाठी आणखी पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी, चिखली येथे २०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. ते लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. सध्या ही संख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी देखील वाढत आहे. हा विचार करता त्यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला आहे. चिखली येथे २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
भामा आसखेड प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आला. हे जलशुद्धीकरण केंद्र झाल्यास चिखली, तळवडे, मोशी, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, जाधववाडी आदी समाविष्ठ गावांना त्याचा फायदा होणार आहे. त्वरीत या कामाला गती देणे आवश्यक आहे. मात्र सध्या या कामाला गती न दिल्याने अद्याप हे काम प्रलंबित राहिले आहे. पुढेही ही समस्या राहू नये, यासाठी प्रस्तावित प्रकल्प तरी त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.