इंद्रायणीनगर, (वार्ताहर) – पाव एक बेकरी पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा, स्वस्त म्हणूनच प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा व सहज उपलब्ध होणारा लोकप्रिय असा पदार्थ. प्रत्येकाच्या सकाळची सुरुवात या बेकरी पदार्थांनी होते. शहराच्या मध्यवस्तीत, बाजारपेठेजवळ कित्येक बेकरी उद्योग आज उभे आहेत. परंतु स्मार्ट सिटी बनू पाहत असलेल्या शहरातील बेकर उद्योग कधी स्मार्ट होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
उद्योगाचे शहर अशी नवी ओळख निर्माण करणार्या स्मार्ट बनू पाहणार्या सिटीतील उद्योग नवीन तंत्रज्ञानामुळे स्मार्ट झाले असल्याची प्रचिती येते. मात्र परंपरागत चालत आलेला बेकरी उद्योग आजही आहे त्याच परिस्थितीत चालत आहे. त्यामुळे या उद्योगाला लागणारे जळाऊ लाकूड, त्यामधून होणारे प्रदूषण, मोठ्या आगीच्या भट्ट्यांमध्ये निर्माण होणारी उष्णता, आग लागण्याची संभावना, बेकरीमधील स्वच्छतेचा अभाव यामुळे नागरी जीवनासोबतच पर्यावरणाला घातक ठरू पहात आहे. हे टाळायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या युगात या परंपरागत चालत आलेल्या बेकरी उद्योगांना आधुनिकतेची झळाळी देण्याची खरी गरज आहे.
बेकरी उद्योगासाठी वृक्षतोड
बेकरी उद्योगासाठी लागणारा सर्वात मोठा व महत्त्वाचा घटक म्हणजे लाकूड. पदार्थ भाजण्यासाठी असलेली मोठी भट्टी पेटवून धगधगता निखारा पाडल्या जातो. हा निखारा कुठल्याही लाकडाचा मिळत नसून त्यासाठी ठराविक झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे कणखर व भरीव अशा देशी वृक्ष असलेल्या बाभळीच्या झाडांची निवड करून याची लाकडे जाळण्यासाठी वापरली जातात.
या लाकडाचा पडलेला निखारा हा तीव्र उष्णता देत मोठ्या कालावधीपर्यंत धगधगत असतो. बेकरी उद्योगासमोर लाकडांची भलीमोठी रास पडली असते. एका दिवसाला एक ते दोन टन जळाऊ लाकूड जळून राख होते. या बेसुमार होणार्या वृक्षतोडीवर कुणीही अवाक्षर काढत नाही.
प्रदूषण, आगीची शक्यता बळावली
शहरात उभ्या असलेल्या बेकरी उद्योगाची ठिकाणे ही बहुतेक करून नागरी वस्त्यांमध्ये, चिंचोळ्या गल्लीबोळात दिसून येतात. बेकरी उद्योगांमध्ये निखा-यामुळे निर्माण होणारी उष्णता, धुरांड्यामधून निघणारा घातक धूर प्रचंड प्रमाणात असतो. उष्णता रोधक उपकरणे, एक्झॉस्ट फॅन, आग विझविण्यासाठी लागणारी यंत्रणा याकडे उद्योजकांनी दुर्लक्ष केले असून साधी नावालाही ही यंत्रणा येथे दिसत नाही. धुरांड्यामधून निघणारा धूर मानवी आरोग्याला घातक आहे शिवाय लहान मुलांच्या श्वसनाच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाची परवानगी फक्त नावालाच
शहरातील बेकरी उद्योग सुरू करण्यापूर्वी प्रशासनाच्या अनेक विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असते. यामध्ये अग्निशामक केंद्र, हवामान प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन ही महत्त्वाची विभाग बेकरी उद्योगांमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. मात्र सुरुवातीला परवानगी दिली की नंतर या उद्योगाकडे साधे फिरूनही पाहिले जात नसल्याचे वास्तव आहे. पैशाच्या जोरावर परवानगी मिळवित उद्योजक व सुस्त प्रशासन बिनधास्त आहेत.
नवीन तंत्रज्ञानाची गरज
मेक इन इंडिया, डिझिटल इंडिया, स्वच्छ भारत अशा अनेक योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. यामुळेच ग्रामीण भागात होणारा चुलीच्या धुराने होणारे प्रदूषण व त्यासाठी होणारी वृक्षतोड कायमची थांबविण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. शहरातील बेकरी उद्योगांना आधुनिकतेची झळाळी देण्याचे प्रयत्न सरकारने करावेत. औद्योगिक वसाहतीत असणार्या उद्योगांनी धरलेली तंत्रज्ञानाची कास व यामधून झालेली भरभराट औद्योगिक शहरात पहावयास मिळेल.