पिंपरी – हिट अँण्ड रन कायद्यामुळे वाहन चालकांना दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड होणार आहे. सध्या या कायद्याला स्थगिती दिली असली तरी तो केंद्राने मागे घेतलेला नाही. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असा इशारा ऑटो रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक चालक मालक फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.
देशभरातील २५ कोटी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील सर्व राज्यातील चालक-मालक या आंदोलनामध्ये सहभागी होतील. या निमित्त बारामती येथे एल्गार मेळावा घेण्यात आला. यावेळी बाबा कांबळे यांनी हा इशारा दिला. यावेळी जय हिंद चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष आरिफ खान, ज्येष्ठ नेते शंकर चिंचक, प्रकाश दंडगव्हाण, सुनिल गंगावणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, हिट अँण्ड रन कायदा मागे घेतला पाहिजे. देशातील २५ कोटी चालक-मालकांच्या हितासाठी सरकारने आयोग गठीत करावा. चालक मालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी वेल्फर बोर्ड निर्माण करावा, देशात चालक-मालकांसाठी ‘ड्रायवर डे’ साजरा करावा, देशातील बॉर्डरवर व आरटीओ कार्यालयामध्ये होणारी चालकांची लूट आणि घुसखोरी थांबवावी, आदी मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी दादा मिसाळ, महेश खवळे, अंबर वाळके, दत्तात्रय कांबळे, बापू कांबळे, रंगनाथ शिंगाडे, अमोल गांगुर्डे, राहुल पोमाणे, चांगदेव बागडे, राहुल गव्हाणे, अकबर शेख, नितीन मानकर, आनंदा ओवाळ, दादासाहेब भोसले, भाऊसाहेब भिसे, असलम शेख, यांनी परिश्रम घेतले.