Rahul Gandhi on Congress । लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर व इंडिया आघाडीवर हल्लाबोल केलाय. यादरम्यान काँग्रेसचे रायबरेलीचे उमेदवार राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षासंदर्भात एक धक्कादायक विधान केलंय. लखनौमध्ये राहुल गांधींची सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका केली. त्यावेळी त्यांनीकाँग्रेस पक्षासंदर्भातही परीक्षणात्मक टिप्पणी केली. त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय.
“काँग्रेस पक्षानंही अनेक चुका केल्या” Rahul Gandhi on Congress ।
सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी,“काँग्रेस पक्षाला येत्या काळात आपल्या धोरणांमध्ये बदल करावा लागेल. काँग्रेसनंही याआधी काही चुका केल्या आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, या चुका नेमक्या कोणत्या आहेत, याबाबत त्यांनी भाषणात स्पष्ट खुलासा केला नाही.
दरम्यान, यावेळी त्यांनी देशातील जातीव्यवस्थेवर व त्याअनुषंगाने होणाऱ्या राजकारणावरही टिप्पणी केली. “या देशातील मोठ्या प्रमाणावरील लोकांचं भवितव्य त्यांच्या जन्माच्या आधीच निश्चित होऊन जातं. यातून लोकांची छोट्या छोट्या गटांमध्ये विभागणी केली जाते. मग हे गट ठरवतात की त्याचे सदस्य कोणत्या कामासाठी पात्र आहेत आणि ते कोणती कामं करू शकत नाहीत”, असे राहुल गांधी म्हणाले.
देशातील जातीव्यवस्थेवर भाष्य करतानाच राहुल गांधींनी,“हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांना अशाच प्रकारे जन्माच्या आधीच निश्चित झालेलं आयुष्य जगावं लागतं. इथे ते भविष्यात काय करणार हे त्यांनी ठरवलेलं नसून समाजानं आधीच ठरवून टाकलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमतेचा ऱ्हास झाला असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे वास्तव स्वीकारून अनेकांनी त्यात बदल करण्यासाठी आवाज उठवलाय, असेही त्यांनी म्हटले.
सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल Rahul Gandhi on Congress ।
दरम्यान, देशातील परिस्थितीबाबत सत्ताधाऱ्यांना यावेळी राहुल गांधींनी लक्ष्य केलं. “जे सत्तेत बसले आहेत, जे त्यांचं पूर्ण आयुष्य फक्त सत्तेच्याच मागे धावले आहेत, ते देशातलं हे वास्तव स्वीकारत नाहीयेत. त्यांनी त्यांचं स्वत:चं वास्तवही स्वीकारलं नाही आणि ते इतरांचंही स्वीकारणार नाहीत”, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्र सोडले.