पिंपरी – जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी शांततेत आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्यांवर राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुषपणे लाठी हल्ला केला. याच्या निषेधार्थ मराठा क्रमंती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, प्रकाश जाधव, सतीश काळे, सचिन चिखले, धनाजी येळकर, सचिन भोसले, काशिनाथ नखाते, प्रवीण कदम, जितू पवार, नकुल भोईर, जिवन बोराडे, मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे, गणेश सरकटे, चेतन बेंद्रे, संदीप नवसुपे, विनायक रणसुभे, वैभव जाधव, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
शहर बंदमधून आरोग्यसेवा व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पिंपरीगाव येथून महाराजांना अभिवादन करून शांततेत आंदोलनास सुरुवात होणार आहे. सर्व आंदोलक पिंपरीगाव येथून चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाणार आहे. या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे धरून निषेध आंदोलने करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे, असे समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.
प्रमुख मागण्या
या वेळी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना करावी, एकाच पक्षाचे असलेले केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी तातडीने हालचाली करून आरक्षण मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत व मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. समाजाची दिशाभूल करू नये. आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी राज्य सरकारने करावी. अमानुष लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मराठा आरक्षण आंदोलकावर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्या आहेत.