पिंपरी -विकसित भारत संकल्प यात्रेचा २१ दिवसांचा दुसरा टप्पा उद्या सोमवारी (दि. ५) सुरू होत आहे. केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत आहे. योजनांसाठी पात्र परंतू लाभापासून वंचित असणा-या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यात येणार आहेत. त्यासाठी सहाकार्य करण्याचे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विकसित भारत संकल्प यात्रा वाहनाचे उद्घाटन सोमवारी (दि. ५) दुपारी ३ वाजता आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. नगर विकास विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी), प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), प्रधानमंत्री ई- बस, सेवा व अमृत योजना यांसह अनेक योजना राबविल्या जातात.
या प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत विकसीत भारत संकल्प यात्राचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने या संकल्प यात्रेचे नियोजन केले आहे.
विकसीत भारत संकल्प यात्रा उद्यापासून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४२ ठिकाणी काढण्यात येत आहे. यात्रेद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील आधार कार्डसह एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्यातून मोहिम राबण्यात येईल.
– आयुक्त शेखर सिंह