आळंदी – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरिजी महाराज यांच्या 75 व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदीनगरी सज्ज झाली आहे. रविवारी (दि. 4) सकाळी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. यावेळी देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळा भरल्याचीच अनुभूती मिळत होती. जवळपास 15 हजारांपेक्षा अधिक भाविकांच्या उपस्थितीत सकाळी ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने शुभारंभ झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव रविवार (दि. 11) पर्यंत चालणार आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरिजी महाराज स्वामी विवेकानंदांसारख्या संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी मगीताभक्ति अमृत महोत्सवाफचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
तपोमूर्ती कल्याणदासजी महाराज, संदीपन महाराज शिंदे व भास्करगिरिजी महाराज यांची किर्तने संपन्न झाली. रविवारपासून इंद्रायणी काठी सुरु झालेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवासाठी 70 हजार चौरस फुटांचा भव्य मांडव उभारण्यात आला आहे. मंचावरील कार्यक्रम प्रत्येक भाविकाला व्यवस्थित पाहता यावेत यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. अध्यात्म, संस्कृती आणि उत्सव यांचा अनोखा भक्तीपूर्ण संगम आळंदीत झाला असून या सोहळ्यासाठी पुढील आठ दिवस देशभरातील साधुसंतांसह दिग्गज राजकीय नेते व मान्यवर हजेरी लावणार आहेत.